‘मासेमारी बंद’नंतर आता लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:45 IST2016-07-09T23:28:07+5:302016-07-10T01:45:17+5:30

बंदरे, मच्छीमारी शांत : ज्येष्ठ, आषाढातच लागतात विवाहाचे वेध

After the 'Fishing Closer'! | ‘मासेमारी बंद’नंतर आता लगीनघाई!

‘मासेमारी बंद’नंतर आता लगीनघाई!

जैतापूर : पावसाच्या आगमनाने आणि शासनाच्या बंदी आदेशामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली...नौका किनाऱ्यावर स्थिरावल्या...आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसह राजापूर तालुक्यातील बंदरेही काही काळासाठी शांत झाली आहेत. तुळसुंदेसह जिल्ह््यातील अन्य खारवी समाजाची वस्ती असलेल्या गावातून सध्या लगीनघाई सुरू झाली आहे.
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या जिल्ह्यातील मोठ्या बंदरासह तुळसुंदे, दांडे-अणसुरे, सागवे, कातळी, नाणार या प्रमुख बंदरांसह खाडीअंतर्गत लहान-लहान गावातून लहान मोठ्या यांत्रिक, बिगर यांत्रिक होड्या, लाँचेस, पर्ससीन नेट आदींद्वारे मासेमारी व्यवसाय चालतो. नारळी पोर्णिमा ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खाडीसह खोल समुद्रात चालणाऱ्या या व्यवसायामुळे बंदरांच्या गावांबरोबरच आजूबाजूच्या गावांमधील बाजारपेठाही गजबजलेल्या दिसतात. मात्र, बंदीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत मात्र किनारपट्टीलगतच्या अनेक गावांतून मात्र मंदी जाणवते.
राजापूर तालुक्यातील एकमेव खारवी समाजाचे गाव असलेल्या तुळसुंदे गावात मात्र मासेमारी बंदी काळात मोठी धावपळ, गडबड असते. त्याला कारणही तसेच आहे. अनेक बंदरांतून या काळात शांतता असताना तुळसुंदे गावात मात्र लगीनघाईची गडबड दिसून येते.
काही वर्षांपूर्वी तुळसुंदेदेखील नावाजलेले मच्छीमारी केंद्र होते. मोठ्या प्रमाणावर गावात सधन समाजाची वस्ती होती. गावात प्रत्येक सण मोठ्या धामधुमीत साजरा होत असे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून दुष्टचक्रात अडकलेला मच्छीमार बांधव पुन्हा सावरू शकलेला नाही. अन्यत्र ऐन चैत्र -वैशाखात लगीनसराई असताना कामानिमित्त बाहेर असलेल्या खारवी समाजात मात्र ज्येष्ठ - आषाढात लगीनसराई असते. समुद्रात बोटींवर कामाला असणाऱ्या खलाशांबरोबरच मुंबई-पुणेसारख्या शहरात असलेला खारवी समाजबांधव पावसाळयातील या महिन्यात गावी येतो.
मुसळधार पडणाऱ्या वरूणराजाच्या साक्षीने नवपरिणित वर-वधूंवर अक्षता पडतात. आता खारवी समाज बांधवांमध्ये लगीनघाई सुरु झाली आहे. (वार्ताहर)


पावसाळयातील दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत गावात म्हामदा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यावर्षी तुळसुंदे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचीही गडबड असल्याने जोरदार शक्ती प्रदर्शनासाठी राजकीय पक्षांकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामध्ये तळीरामांची मात्र चांगलीच चंगळ होणार आहे.

Web Title: After the 'Fishing Closer'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.