रत्नागिरी : मोबाइलवर गेम खेळण्याच्या नादातून बेचैन होऊन त्यातून आलेल्या नैराश्यातून युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना नाणीज (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली. रवींद्र राजेंद्र बेंद्रे (१७, रा. नेवासा बुद्रूक, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे या युवकाचे नाव आहे.याबाबत त्याचे मामा विकास पोपट म्हसे (रा. नाणीज, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस स्थानकात माहिती दिली. रवींद्र याला मोबाइलवर सातत्याने गेम खेळण्याचा नाद होता. गेम खेळायला मिळाला नाही, तर ताे बेचैन हाेत असे. मंगळवारी दुपारी त्याने गेम खेळण्याच्या या नादातूनच बेचैन होऊन नैराश्यातून राहत्या खोलीच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली.
ही बाब मामा म्हसे यांना समजताच त्यांनी रवींद्र याला खाली उतरवून पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्षणासाठी मामाकडेरवींद्र बेंद्रे हा मूळचा अहिल्यानगर येथील राहणारा आहे. ताे नाणीज येथे आपल्या मामाकडे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आला हाेता. गेल्या २० दिवसांपासून ताे नाणीज येथे राहत हाेता. मात्र, त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने साऱ्यांनाच धक्का बसला.