कोकण विभागातील ६८ हजार शेतकरी थकबाकीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:38+5:302021-04-11T04:30:38+5:30
रत्नागिरी : कृषी ग्राहकांना वीजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ...

कोकण विभागातील ६८ हजार शेतकरी थकबाकीमुक्त
रत्नागिरी : कृषी ग्राहकांना वीजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोकण प्रादेशिक विभागातील ६८ हजार ६७ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यात आले आहे.
या थकबाकीमुक्त योजनेंतर्गत राज्यातील आठ लाख सहा हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून, त्यातील एक लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळवली आहे. या थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना वीजबिलांतून तब्बल २५५ कोटी २ लाख रूपयांची सवलत मिळाली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्ती देण्यासाठी एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्याप्रमाणे ४४ लाख ४४ हजार १६५ शेतकऱ्यांकडील एकूण ४५ हजार ७८७ कोटी १९ लाखांच्या एकूण थकबाकीमध्ये १० हजार ४२१ कोटी रूपयांची निर्लेखनाद्वारे सवलत देण्यात आली आहे तर ४ हजार ६७२ कोटी ८१ लाख रूपयांची व्याज व विलंब आकारामध्ये सवलत दिली आहे. या योजनेनुसार कृषी ग्राहकांकडे ३० हजार ६९३ कोटी ५५ लाख रूपयांची सुधारित मूळ थकबाकी आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात ५० टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी उपलब्ध केली आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी ३३ टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्याची तरतूद कृषिपंप वीज धोरणामध्ये करण्यात आली आहे.
राज्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी चालू व थकीत वीजबिलांपोटी ३३० कोटी ४२ लाख रूपयांचा भरणा करून वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळवली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेच्या एकरकमी म्हणजे २५५ कोटी २ लाख रूपयांसह चालू वीजबिलांच्या ७५ कोटी ४० लाख रूपयांचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांना सुधारित मूळ थकबाकीमध्ये तब्बल २५५ कोटी दोन लाख रूपयांची सवलत मिळाली आहे. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागातील ६८ हजार ६७ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्व थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना महावितरणकडून थकबाकीमुक्तीचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.
काेट
महाकृषी ऊर्जा अभियानात आतापर्यंत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसाठी या अभियानात सहभाग नोंदवला आहे. त्यांनी कृषिपंपाच्या थकीत व चालू वीजबिलांपोटी ७४१ कोटी ४ लाख रूपयांचा भरणा केला आहे. थकीत वीजबिलांतून मुक्ती व परिसरातील कृषी वीज यंत्रणेचा विकास साधणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानात सर्व थकबाकीदार कृषी ग्राहकांनी सहभागी व्हावे.
- विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण व व्यवस्थापकीय संचालक.