६२ बोगस शिक्षकांची पदावनती होणार
By Admin | Updated: February 26, 2015 00:07 IST2015-02-25T23:46:01+5:302015-02-26T00:07:52+5:30
लोकमतचा प्रभाव : जिल्हा परिषद शिक्षण समितीत निर्णय; १५ दिवसांत पुरावे सादर करण्याचे आदेश

६२ बोगस शिक्षकांची पदावनती होणार
रत्नागिरी : जिल्ह्यातील ६२ पदवीधर शिक्षकांची पदावनती करण्यात येणार असून, त्यांच्याकडून वाढीव वेतनाची वसुली करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. या शिक्षकांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी सादर केली होती. ही पदवी अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ते न दिल्यास ही कारवाई होणार आहे.अलाहाबाद विद्यापीठाच्या बोगस पदवीबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आली. जिल्ह्यातील ६२ शिक्षकांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी धारण करून पदवीधर शिक्षक म्हणून शिक्षण विभागाकडून पदोन्नती मिळविण्यात यश मिळविले होते. त्यांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधर शिक्षकांची यादीही शिक्षण समितीच्या सभेत जाहीर करण्यात आली.
शिक्षण समितीच्या सर्वच सदस्यांनी अशा पदवीधर शिक्षकांवर कारवाई करण्याबाबत जोरदार चर्चा केली. त्यानंतर हा कारवाईचा निर्णय घेण्यात आला. (शहर वार्ताहर)
अलाहाबाद विद्यापीठाची पदवी सादर करणाऱ्या शिक्षकांनी ही पदवी अधिकृत असल्याचे पुरावे १५ दिवसांत सादर करावेत, त्याबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. १५ दिवसांत पुरावे सादर न करणाऱ्या पदवीधर शिक्षकांची पदावनती करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून वाढीव वेतनाची वसुली करावी, असाही निर्णय घेण्यात आला आहे.
- ऐश्वर्या घोसाळकर, -शिक्षण समिती सभापती, जि. प. रत्नागिरी.