मिसिंग लिंक कधी होणार, द्रुतगतीवर अकरा महिन्यांत अपघातांत २५ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 06:20 IST2024-12-02T06:11:47+5:302024-12-02T06:20:20+5:30
गेल्या दहा वर्षांत पाचशे जणांचा अपघाती मृत्यू

मिसिंग लिंक कधी होणार, द्रुतगतीवर अकरा महिन्यांत अपघातांत २५ ठार
अलिबाग : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. रायगड हद्दीत खालापूर भागात महामार्गावर आडोशी हा डेथ स्पॉट बनला असून अकरा महिन्यात या परिसरात ८५ अपघात झाले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहेत. खालापूर येथून मिसिंग लिंकचे काम सुरू आहे. यामुळे हा डेथ स्पॉट यातून वगळला जाणार आहे. मात्र ही लेन कधी सुरू होणार, असा प्रश्न वाहनचालक करत आहेत.
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर ४५ अपघात झाले असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. अवजड वाहने, हलकी वाहने आणि ओव्हरटेक करण्यासाठी तीन लेनची रचना आहे. खालापूर तालुका हद्दीत घाट उतरून मुंबईकडे जाताना आडोशी उतार अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे.
लेनची शिस्त मोडल्याने होतात अपघात
घाटातून मुंबईच्या दिशेने जाताना खालापूर टोल नाक्यापर्यंत साधारण आठ किलोमीटरची चौथी लेन तयार करण्यात आली आहे. ही लेन केवळ अवजड वाहनांच्या वापरासाठी आहे. परंतु लेनची शिस्त पाळली जात नसल्याने अपघात होत आहेत.