खोरा बंदर पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: May 1, 2016 02:36 IST2016-05-01T02:36:34+5:302016-05-01T02:36:34+5:30
वर्षभर मुरुड जंजिरा किल्ल्यावर लाखो पर्यटक भेट देतात. याठिकाणी असलेल्या खोरा बंदराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, शिवाय एकदरा येथील स्थानिकांनाही

खोरा बंदर पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत
मुरुड/जंजिरा : वर्षभर मुरुड जंजिरा किल्ल्यावर लाखो पर्यटक भेट देतात. याठिकाणी असलेल्या खोरा बंदराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, शिवाय एकदरा येथील स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत निधी उपलब्ध करून खोरा बंदराचा पर्यटनक्षेत्र म्हणून विकास करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पूर्वी मुंबईवरून येतांना खोरा बंदरातून येणाऱ्यांची संख्या मोठी होती. रत्नागिरीला जाणारी चौगुले कंपनीची बोट जंजिरा किल्ल्याजवळ खोल पाण्यामध्ये थांबत असे त्यानंतर छोट्या बोटीने प्रवाशांना खोरा बंदरातील जेट्टीवर उतरवले जायचे. आणि घोडागाडीने मुरु ड -जंजिरा गाठता यायचे. कालांतराने एसटी सेवा सुरु झाली आणि खोरा बंदर हळूहळू नामशेष झाले. पर्यटनाला चालना देण्यासाठी खोरा बंदराचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे.
जंजिरा किल्ल्यासमोरील खोरा बंदराच्या जेट्टीजवळ खोली कमी आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी हे बंदर सोयीचेआहे. राजपुरी जेट्टीवरून जंजिरा किल्ला पहायला पर्यटक लाखोंच्या संख्येने जात असतात. नुकतेच जाहीर आकडेवारीनुसार, सुमारे तीन लाख पर्यटक वर्षभरामध्ये मुरु ड-जंजिरा किल्ल्यावर भेट देत असल्याचे उघड झाले आहे.
राजपुरी जेट्टीवर वाढणारा ताण पाहता एकदरा गावाला खेटून असलेल्या खोरा बंदरांमधून जंजिरा किल्ल्यावर यांत्रिकी बोटीमधून प्रवासी जाऊ लागले आहेत. डोंगरी गाव, राजपुरी, एकदरा अशा ठिकाणचे ग्रामस्थ या सेवेमुळे रोजगार मिळू लागला आहे. पण खोरा बंदराचे जुने वैभव लोप पावले आहे.
खोरा बंदराचा परिसर उत्तम इमारतीने सजला होता. शौचालयाची व्यवस्था नवाब काळापासून होती. पण जंजिरा बोट सेवा सुरु झाली. तेव्हा संपूर्ण खोरा बंदर उध्वस्त झाले होते व अजून तसेच आहे.
डोंगरी गावामधील विश्वास भोसले यांनी आपल्या आठवणी सांगतांना खोरा बंदराचा संपूर्ण वैभवशाली इतिहास सांगितला. पन्नास वर्षापूर्वी इथे उपहार गृह होते. दिवस - रात्र माणसांची रेलचेल होती. ओहटी असल्यावर मुरु ड, एकदरा येथील मासेमारी करणाऱ्या बोटी खोरा बंदराचा आसरा घेत असत. गतवैभव परत मिळवण्यासाठी, खोरा बंदराचा विकास होणे गरजेचे असून त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
खोरा बंदराच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होत आहेत . त्यामुळे लवकरच इथे पर्यटकांसाठी अधिक सोयी उपलब्ध करून देऊ. लवकरच खोरा बंदराचे गतवैभव परत मिळवू
- उमेश पाटील, तहसीलदार, मुरुड