अनलॉकमुळे रायगडमधील व्यवहार सुरळीत; शैक्षणिक, मनोरंजन, खेळविश्व अद्याप ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:17 AM2020-07-02T04:17:46+5:302020-07-02T04:18:00+5:30

अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर; एमआयडीसीतील कारखाने सुरू

Unlock makes transactions in Raigad smooth; Educational, entertainment, sports world is still jammed | अनलॉकमुळे रायगडमधील व्यवहार सुरळीत; शैक्षणिक, मनोरंजन, खेळविश्व अद्याप ठप्पच

अनलॉकमुळे रायगडमधील व्यवहार सुरळीत; शैक्षणिक, मनोरंजन, खेळविश्व अद्याप ठप्पच

Next

आविष्कार देसाई 

रायगड : अनलॉकनंतर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यवहार, उद्योग-धंदे सुरळीतपणे सुरू झाले आहेत. अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अद्यापही शैक्षणिक, मनोरंजन आणि खेळाच्या विश्वाला ब्रेक लागलेला असल्याने, या क्षेत्राला लवकरच सूट मिळणे गरजेचे झाले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगच रसातळाला गेले आहे. कोरोनाचा प्रभाव अद्यापही थांबलेला नाही, तर उलट त्याचा आलेख सातत्याने उसळ्या घेत आहे. कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ सरकार आणि प्रशासनासमोर डोकेदुखी ठरत आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये सर्वप्रथम ६ मार्च रोजी कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला होता. परदेशवारी करून आलेल्या नागरिकांमुळेच सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यामध्ये दुबई, अमेरिका, रशिया, आखाती देश, जर्मनी, आस्ट्रेलिया अशा विविध देशांतून नागरिक मोठ्या संख्येने आले होते. त्यानंतर, राज्यातून नागरिकही मोठ्या प्रमाणात आले होते, तसेच चाकरमान्यांची संख्याही लाखोंच्या घरात होती. प्रचंड संख्येने आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याला पोषक वातावरण मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांची संख्या आजही वेगाने वाढत असल्याचे दिसून येते.

सरकार आणि प्रशासनाने कोरोनाचा होणारा फैलाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग बंद करण्याचे आदेश दिले होते. सक्तीचे लॉकडाऊन असल्याने छोटे-मोठे व्यवसायही बंद पडले. बाजारपेठांतील दुकानांना टाळे लागले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. सरकारने उपेक्षित घटकांना अन्नधान्य वाटप केले. देशाच्या फाळणीनंतरचे सर्वाधिक मोठे स्थलांतर याच कालावधीत झाल्याचे पाहायला मिळाले.

सर्व व्यवहार उद्योग बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्न गंभीर रूप धारण करत होता. सरकारही अजून किती कालावधीसाठी जनतेचे पोट भरणार, असा प्रश्न उपस्थित झाला. कोरोनाचे संकट कधी संपेल, याची कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आता आपल्याला कोरोनाला सोबत घेऊनच जगावे लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले. त्यानंतर, सरकारनेही काही ठिकाणी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करण्याला परवानगी दिली. आता जिल्ह्यातील अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळाल्याने आता त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निकाली निघाला आहे. उद्योग सुरू झाल्याने स्थलांतरित मजूर पुन्हा आपापल्या मूळ पदावर येत आहेत. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारनेही ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अंगीकार करत, शिक्षण देण्याला सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, माणसांचे जीव वाचविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा होता. वर्ष-सहा महिन्यांत नुकसान भरून येईल. मात्र, मृत्यू झालेली व्यक्ती परत मिळणार नाही. - दिलीप जैन, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन

गेल्या १०० दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला योग्य ती साथ दिली. त्याचमुळे आपण कोरोनाचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रभाव रोखू शकलो, कोरोनामुळे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर मृत्यूचे प्रमाण कमी आहे. नागरिकांनी

यापुढे शंभर दिवस अशीच आपली, समाजाची काळजी घेऊन सहकार्य करावे. जिल्ह्यातील बहुतांश उद्योग-व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

काय सुरू?
जिल्ह्यामध्ये आता बहुतांश उद्योग, व्यवसाय, दुकाने सुरळीत सुरू झाली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आर्थिक गती प्राप्त झाली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. आणखी काही दिवसात व्यवहार सुरळीत होतील आणि विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसेल.

कोरोना कालावधीतील लॉकडाऊनमुळे आमचे मोठे नुकसान झाले. मात्र सरकार आणि प्रशासनाने टप्प्याटप्प्यात लॉकडाऊन
शिथिल केल्याने आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांची विस्कटलेली आर्थिक घडी बसण्यास मदत मिळत आहे. - राहुल साष्टे, व्यावसायिक

काय बंद?
जिल्ह्यामध्ये अद्यापही सिनेमागृह, नाट्यगृह बंद आहेत. त्यामुळे चालक-मालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. तेथील कामगारांवर बेकारीची कुºहाड पडली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शिक्षणात अडचणी आहेत. खेळाचे क्षेत्रही बंदच आहे.

कोरोनामुळे जगावरच संकट ओढवले आहे. सरकारने लॉकडाऊन करण्याचा चांगला निर्णय घेतला. आता अनलॉक सुरू झाले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था मूळपदावर येत आहे. काही उद्योग बंद आहेत, परंतु कोरोनाचा प्रभाव पाहून सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेईल.
- सत्यजीत दळी, ओबीव्हीएम, सिनेप्लेक्सचे मालक

Web Title: Unlock makes transactions in Raigad smooth; Educational, entertainment, sports world is still jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.