सुधारित आराखडा तीन वर्षे रखडला
By Admin | Updated: August 1, 2015 23:25 IST2015-08-01T23:25:49+5:302015-08-01T23:25:49+5:30
शहराची टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्किम मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे आजतागायत हस्तांतरित करण्यात आलेली नाही.

सुधारित आराखडा तीन वर्षे रखडला
पनवेल : शहराची टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्किम मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे आजतागायत हस्तांतरित करण्यात आलेली नाही. नगरविकास विभागाकडे या योजनेची फाईल धूळखात पडली आहे. हे कारण असले तरी याकरिता आवश्यक असलेला सुधारित आराखडाही गेल्या अडीच तीन वर्षांपासून रखडला आहे. याकरिता पालिकेने जवळपास ८५ लाख रुपये खर्च केले असले तरी अद्याप फक्त वीस टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पनवेल शहराकरिता १७ एप्रिल १९६४ रोजी अधिसूचना जाहीर होऊन पहिली टीपी स्किम मंजूर झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या आणि नागरीकरण मर्यादित होते. गेल्या काही वर्षांत पनवेल शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यात आणखी भर पडणार आहे.
शहरातील जुने वाडे आणि चाळी जमीनदोस्त करून त्या जागेवर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे दुकान, मॉल्स यांचाही विस्तार झाला आहेच. त्याचबरोबर व्यापारी संस्था, राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँका आणि खाजगी कार्यालयांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच शहरातील रस्ते, गटारे यांसारख्या सुविधांचा विस्तार आणि विकास करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन टीपी स्किम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. आणि १३ आॅगस्ट २००९ रोजी अधिसूचना काढली. मात्र अधिसूचना काढण्यापलीकडे नगरविकास विभागाने काहीही केलेले नाही.
नोव्हेंबर २०१२ पासून कामाला सुरुवात
याकरिता नगरचनाकार श्रीकांत देव यांच्या नेतृत्वाखाली अनुपमा कुमवणी, तेजल सुताडे, अरुण सुरवसे असे एकूण चार जण काम करीत आहेत. नोव्हेंबर २०१२ साली सुधारित आराखड्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. या कामाकरिता देव यांना जूनपर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुमवणी यांना १५ लाख २१ हजार ६८८ रुपये देण्यात आले आहेत. उर्वरितांना अनुक्र मे ३ आणि २ लाख रुपये पालिकेने दिले आहेत. जवळपास ५० लाख रुपये वेतनापोटीच खर्च झाले आहेत. त्याचबरोबर इतर खर्च असे एकूण ८५ लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र त्या तुलनेत काम काहीच झाले नसल्याची खंत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
सुधारित आराखडा तयार करण्याचे काम गेली कित्येक महिने सुरू आहे. जे आजपर्यंत पूर्ण झाले नाही ते कधी होणार याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही. मात्र यावर जवळपास ८५ लाख रुपये खर्च झाले असून लवकरच ही रक्कम कोटीच्या घरात जाईल, याबाबत प्रशासनाला काहीच पडलेले नाही. पैसे खर्च होऊ द्या पण त्या बदल्यात काम झाले पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे फक्त १० ते २० टक्के काम झाले आहे. - जयंत पगडे, नगरसेवक.