रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात पेरण्या पूर्ण
By Admin | Updated: June 21, 2016 01:31 IST2016-06-21T01:31:09+5:302016-06-21T01:31:09+5:30
यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली

रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात पेरण्या पूर्ण
जयंत धुळप, अलिबाग
यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. रायगड जिल्ह्यात पावसाला नेहमीपेक्षा उशीर झाला असला तरी प्रारंभाच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असून, समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक नक्षत्र आणि पावसाच्या समन्वयाच्या अभ्यासानुसार सध्याचा पाऊस टिकणारा असल्याने शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ज्या ठिकाणच्या पेरण्या झाल्या, तेथे भाताची उगवण चांगली व दमदार झाली असल्याची माहिती शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ४१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पीक लागवड होणार आहे. यापैकी १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भात, १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नागली, १ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर तूर, १ हजार ९० हेक्टर क्षेत्रावर कडधान्ये तर ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण १७ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी १५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यास पोहोच होवून त्यापैकी ७० टक्के बियाणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांस आवश्यक पीक कर्ज सत्वर उपलब्ध करुन देण्याकरिता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष नियोजन केले आहे तर त्याच सोबत राष्ट्रीय तसेच खासगी बँकांच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यातील ३४ हजार १४५ शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी सन २०१६-१६च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना १५८ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते.