शेकापच्या विचारसरणीला जनतेने नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:10 AM2019-10-26T00:10:36+5:302019-10-26T00:11:16+5:30

सर्वाधिक मते मिळवत शिवसेना ठरली नंबर वन; एकही उमेदवार निवडून न आलेला शेकाप दुसऱ्या स्थानी

The public rejected the thought of shekap | शेकापच्या विचारसरणीला जनतेने नाकारले

शेकापच्या विचारसरणीला जनतेने नाकारले

googlenewsNext

- आविष्कार देसाई

अलिबाग : विधानसभेच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तब्बल चार लाख ३७ हजार २१९ मते शिवसेनेने मिळवली आहेत. शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. एके काळी जिल्ह्यात दबदबा असणाºया कम्युनिस्ट विचारधारेच्या शेकापला तीन लाख १५ हजार ३५१ मतदारांनी पसंती दिली आहे. तो दुसºया क्रमांकावर राहिला आहे, तिसºया क्रमांकावर भाजपने मुसंडी मारताना दोन लाख ९४ हजार ४८९ मते घेत त्याच्या दोन उमेदवारांना विधानसभेचे दरवाजे उघडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येत ती चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. त्यांना एक लाख ७६ हजार २३६ मते, तर एके काळी जिल्ह्यात दबदबा असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात फक्त ८५ हजार ५५४ मते मिळाली आहेत. काँग्रेसला भोपळा फोडता आलेला नाही.

जिल्ह्यातील राजकारणावर शेकापच्या कम्युनिस्ट विचारधारेचा प्रभाव होता. मात्र, कालांतराने चुकत गेलेल्या धोरणामुळे जनतेने आताच्या निवडणुकीत त्यांना नाकारल्याचे दिसून येते. शेकापने अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या चार मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यातील एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारत एक प्रकारे शेकापच्या कम्युनिस्ट विचारधारेलाच लगाम घातल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत आणि श्रीवर्धन येथे आपले उमेदवार दिले होते. त्यातील श्रीवर्धनची जागा अदिती तटकरे यांनी राखली. मात्र, कर्जत राष्ट्रवादीच्या हातून गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. आताच्या निवडणुकीतही त्यांची आघाडी होती. शिवाय अलिबाग आणि पेणची काँग्रेस वगळता अन्य काँग्रेस आघाडीमध्ये होती.

मुळात अशा युतीला मतदारांनी नाकरल्याचेच त्या निमित्ताने दिसून येते. सत्तेसाठी आघाडीतील नेते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे भाजपचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले होते. मतदारांवर हे बिंबवण्यात शिवसेना आणि भाजप यशस्वी झाली, असे म्हणण्यासाठी वाव असल्याचे निकालावरून दिसते. केंद्र आणि राज्यामध्ये युतीची सत्ता आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा, तसेच घेतलेल्या धाडसी निर्णयाचे ब्रॅण्डिंग युतीच्या माध्यमातून उत्तम प्रकारे झाले. त्यातच जिल्ह्यातील जनतेला बदल पाहिजे होता, म्हणूनच जिल्ह्यातील लागलेले निकाल हे अनपेक्षित असेच आहेत.

शेकापने मतदारांना धरले गृहित

आघाडीने विशेष करून शेकापने मतदारांना गृहीत धरले होते. मात्र, शेकापला त्यांचे बालेकिल्ले असणाºया अलिबाग आणि पेणमध्येच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अलिबागमधील शेकापचे उमेदवार सुभाष पाटील यांच्या पाठीशी त्यांचे अख्खे कुटुंब उतरले होते. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. १९५२ सालापासून शेकापने जिल्ह्यावर आपले कायम वर्चस्व ठेवले होते.

एकेकाळी २५ आमदार निवडून येणाºया पक्षाचा आज केवळ एकच आमदार निवडून येणे ही खरोखरच आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. विकासकामांच्या बाबतीमध्ये जिल्ह्याला झुकते माप मिळणे गरजेचे होते. मात्र, सत्तेच्या माध्यमातून स्वत:चाच विकास साधण्याच्या नादात शेकापची आज शकले झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शेकापने काळाबरोबर आपल्यामध्ये बदल न केल्यानेच पारंपरिक मतदार वगळता युवा मतदारांना आकर्षित करण्यात ते कमी पडले आहेत. शिवसेना-भाजपने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती अशा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासाची भूमिका घेऊन शिरकाव केला होता. त्याचे फलस्वरूप शिवसेनेचे तीन आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून येण्यात झाले आहे.

निवडणुकीत जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरत असला तरी आताच्या निवडणुकीत आगरी, कोळी, भंडारी, माळी, ब्राम्हण, दलित, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन अशा सर्वच जाती धर्माच्या मतदारांनी मतदान केले. मतदार हा जाती धर्माच्या साच्यात न अडकता निर्भीडपणे त्यांनी मतदान केले. अलिबाग, पेण या ठिकाणी तर मतदारांनी आपल्या मनातील चीड बाहेर काढली आणि शेकापच्या विरोधात मतदान केले.
प्रामुख्याने अलिबागमध्ये काँग्रेसची मते ही शिवसेनेच्या बाजूने झुकली. कारण २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मधुकर ठाकूर यांना 45000 मते मिळाली होती.

आताच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांना सुमारे दोन हजार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांना सुमारे १२ हजार मते मिळाली. शेकापला जिल्ह्यात शेकापचा एकही उमेदवार निवडून आलेला नसला, तरी त्यांना एकूण मिळालेल्या मतांमुळे ते दुसºया स्थानावर आहेत. त्यामुळे शेकाप संपला असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. आगामी कालावधीत ते पराजयाची कारणे शोधतील आणि पुन्हा नव्या जोमाने तयारी करून रणांगणात उतरतील.

शेकापने आता आपल्या विचारधारेत बदल करायला सुरुवात करणे क्रमप्राप्त झाले आहे. काँग्रेसनेही नव्या जोमाने सुरुवात करायला पाहिजे. मात्र, काँग्रेसला जिल्ह्यात सक्षम नेतृत्व मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसला चाचपडत राहावे लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकाप सोबत आघाडी केल्याने पक्षवाढीवर निर्बंध येत आहेत. पक्ष वाढला नाही तर कार्यकर्तेही वाढणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात स्वत: भोवती बांधून घेतलेली चौकड तोडावी लागणार आहे. शिवसेना आणि भाजप यांनी ‘उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका’ या युक्तीप्रमाणे आगेकूच ठेवली तर त्यांच्यासाठी चांगलेच राहणार आहे.

Web Title: The public rejected the thought of shekap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.