७० हजार कोटींचे प्रकल्प कागदावर; रायगडमध्ये ५ वर्षांत एकाही प्रकल्पाची मुहूर्तमेढ नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:22 IST2025-06-05T14:22:30+5:302025-06-05T14:22:43+5:30
प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

७० हजार कोटींचे प्रकल्प कागदावर; रायगडमध्ये ५ वर्षांत एकाही प्रकल्पाची मुहूर्तमेढ नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यात ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे प्रकल्प मंजूर झाले आहेत. याद्वारे बेरोजगारीचा प्रश्न मिटणार असा दावा करण्यात येत असला तरी प्रकल्पांना मंजुरी मिळूनही एकही प्रकल्प पाच वर्षांत उभा राहिला नाही. दरम्यान, प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाविकास आघाडी आणि महायुती सरकार काळात ७० हजार कोटींचे औद्योगिक प्रकल्प रायगड जिल्ह्यात मंजूर झाले. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असून, रोजगाराचा प्रश्न सुटणार होता. मात्र, सद्य:स्थितीत प्रकल्प मंजूर आहेत, पण कागदावरच आहेत.
मुरुड, रोह्यात प्रकल्प
रोहा, मुरुड या ठिकाणी राज्य सरकार अंतर्गत ३० हजार कोटींची गुंतवणूक असणारा औषध निर्मित प्रकल्प होणार आहे. प्रकल्पात ३० ते ४० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. एकंदरीत ५५ हजार कोटींची गुंतवणूक प्रकल्प मंजूर झाले आहेत. राज्यातील प्रकल्प गुंतवणुकीत रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीच्या २७०० कोटी तर स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा २०३४ कोटींच्या प्रकल्प गुंतवणुकीच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.
आतापर्यंत काय घडले?
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद कार्यक्रमात जिल्ह्यात २ हजार ३११ कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले असून, यातून २ हजार ८६५ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. जिल्ह्यात ७० हजार कोटींचे उद्योग प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून प्रस्तावित आहेत.
रायगड जिल्ह्यात ६५ ते ७० हजार कोटींची गुंतवणूक करणारे प्रकल्प मंजूर आहेत. यासाठी काही प्रकल्पांना जागेची उपलब्धता झाली आहे, तर काही प्रकल्पांना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ती उपलब्धता होऊन हे प्रकल्प उभारले जातील.
-उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र