भाताच्या उत्पादनात बचत शक्य !
By Admin | Updated: June 17, 2016 02:02 IST2016-06-17T02:02:53+5:302016-06-17T02:02:53+5:30
खर्चात बचत करणे हे पैसे कमावल्याच्या बरोबरीचे असते. कृषी विभागामार्फत यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम न होता त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आराखडा

भाताच्या उत्पादनात बचत शक्य !
- जयंत धुळप, अलिबाग
खर्चात बचत करणे हे पैसे कमावल्याच्या बरोबरीचे असते. कृषी विभागामार्फत यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम न होता त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. राज्यातील प्रमुख खरीप पिकामध्ये कापूस, सोयाबीन, भात, तूर व मका या पिकांच्या उत्पादनावर परिणाम न होता, पिकांच्या उत्पादन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मोहीम महिन्याभरात राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती खोपोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार यांनी दिली आहे.
कोकण विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके या निविष्ठावरील खर्च व भात पिकांच्या पूर्वमशागत, रोपवाटिका, लावणी, काढणी व मळणीपर्यंत मजुरीवर होणारा खर्च वाढत आहे. पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी सध्या अवलंबत असलेल्या पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे सिगेदार यांनी सांगितले.
भात लागवडीसाठी घेतलेले प्रमाणित बियाणे पुढील दोन हंगामापर्यंत वापरल्यास तीन वर्षात बियाण्यावर होणारा खर्च ६६ टक्के कमी होईल, रोपवाटिकेत बियाणे टाकण्यापूर्वी बियाण्यास ३ टक्के मिठाच्या पाण्याची, थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास व नंतर पी.एस.बी जीवाणू संवर्धकाची बीजप्रकिया केल्यास कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल, व जमिनीतील स्फूरद पिकांस उपलब्ध होईल.
भात लागवडीसाठी एका चुडावर एकच रोप लावावे. त्यासाठी ५ किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होईल, व बियाणे खर्चात बचत होईल. चारसूत्री पध्दतीने भात लागवडीसाठी भाताच्या वाणानुसार २0 ते ३0 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात बियाणे पेरावे. भात रोपवाटिकेत रोपाचे कीड व रोगापासून संरक्षण करावे. त्यामुळे पुन:लागवड नंतरच्या पीक संरक्षण खर्चात बचत होते. शेतकरी व महिला गटांनी सामूहिक पध्दतीने रोपवाटिका तयार केल्यास मजुरी व देखभाल खर्चात बचत होते. रोपाचे वय १२ ते १५ दिवस असताना पुन:लागवड करावी. अधिक वयाची रोपे लावल्यास रोपवाटिका व्यवस्थापनाचा खर्च वाढतो व फुटवे कमी आल्यामुळे उत्पादनात घट होते, अशी सूचना सिगेदार यांनी केली आहे.
जमिनीची पूर्वमशागत (नांगरट व चिखलणी) ही कामे ट्रॅक्टर किंवा पॉवरटिलरद्वारे केल्यास मजुरीचा खर्च वाचतो. भाताची पुन:लागवड लावणी यंत्राद्वारे केल्यास मजुरी खर्चामध्ये २५ ते ४० टक्के बचत होते. वरकस जमिनीत पेरणी यंत्राच्या वापराचा सल्ला यावेळी अधिकाऱ्यांनी दिला.
- वरकस जमिनीमध्ये भाताच्या पेरणीकरिता बियाणे व खत पेरणी यंत्राचा वापर करावा. भात लागवडीसाठी मशागतीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी सगुणा भात तंत्राचा वापर करावा. गादीवाफ्यावर टोकण पध्दतीने भात लागवड करावी. त्यामुळे रोपवाटिका तयार करण्याची आवश्यकता नाही व बियाणेही कमी लागते. आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खताचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
१) तण नियंत्रणासाठी योग्य वेळेस शिफारशीनुसार तणनाशकाचा वापर करावा. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होईल. पुन:लागवड भात पिकात तणाच्या बंदोबस्तासाठी कोणोविडरचा वापर करावा. कीड-रोग सर्वेक्षणासाठी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, कीड व रोग नियंत्रणाचे उपाय करण्याचा सल्ला देण्यात आला.
२) कीड-रोग नियंत्रणासाठी कामगंध सापळे व जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. जैविक कीटकनाशके शक्यतो घरी तयार करावीत. भात पिकाच्या बांधावर तूर पिकांची लागवड करावी. भात कापणी व मळणीसाठी यंत्राचा वापर करावा. यामध्ये खर्चात २० ते २५ टक्के बचत होते.
३) भात पिकानंतर उपलब्ध ओलाव्यावर वाल, हरभरा,मसुर या दुबार पिकांची लागवड करावी. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नासोबतच जमिनीचा पोत सुधारतो, पुढील वर्षी उत्पादन चांगले येते. सामूहिक किंवा गट पध्दतीने यंत्राचा वापर केल्यास सर्वाचा खर्च कमी होईल व खरेदीचा भार एकट्यावर राहणार नाही.