वीर रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल

By Admin | Updated: May 10, 2017 00:21 IST2017-05-10T00:21:35+5:302017-05-10T00:21:35+5:30

ऐतिहासिक महाड तालुक्यातील कोकण रेल्वेच्या वीर रेल्वे स्थानकामध्ये सुविधांची वानवा आहे. दिवसा उजेडी कोकण रेल्वेने

Passengers' arrival at Veer railway station | वीर रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल

वीर रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : ऐतिहासिक महाड तालुक्यातील कोकण रेल्वेच्या वीर रेल्वे स्थानकामध्ये सुविधांची वानवा आहे. दिवसा उजेडी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळत असल्या तरी रात्रीच्या वेळी वीर रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांचे सुविधांअभावी प्रचंड हाल होत आहेत. पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने या ठिकाणी अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. रेल्वे स्थानकात उतरलेल्या या प्रवाशांच्या आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहतूक सुविधा नसल्याने अनेक प्रवाशांना रात्र स्थानकातच काढावी लागत आहे. या सुविधांकडे मात्र कोकण रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महाड शहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर कोकण रेल्वेचे वीर स्थानक आहे. या स्थानकात मध्यरात्रीच्या वेळी सावंतवाडी-मुंबई व पहाटेच्या वेळी मुंबई-सावंतवाडी राज्यराणी थांबते. तर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दादर- सावंतवाडी पॅसेंजर ही लोकल गाडी थांबते. वीर रेल्वे स्थानकामध्ये लाइटची सुविधा असली तरी पुढे महामार्ग जोड रस्त्याला कोणतीच लाइटची सुविधा नसल्याने रात्रीच्या तीन गाड्यांनी प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोक ण रेल्वेतील प्रवास करणारे हे प्रवासी या वीर रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्या गावी जाण्यासाठी काहीच सुविधा नसल्याने महामार्गावर येवून गाड्यांची वाट पहावी लागते. मुळातच रस्ता अरुंद, प्रवासी आणि सामानांची गर्दी यामुळे वीर रेल्वे स्थानकाबाहेरील महामार्ग अपघात स्थळ बनले आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रवासी रात्रीच्या वेळी वीर रेल्वे स्थानकाबाहेर गाड्यांना हात दाखवताना दिसतात. रात्रीचा प्रवास असल्याने खाजगी अगर एसटी महामंडळाची बस या ठिकाणी थांबत नाही. वेळोवेळी मागणी करून देखील कोकण रेल्वे प्रशासन लाइटच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
२० मार्च रोजी अशाच प्रकारे मध्यरात्रीच्या वेळी रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला अपघात झाल्याची घटना घडली. तसेच रात्रीच्या वेळी या वीर रेल्वे स्थानकाबाहेर अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र त्याची नोंद झालेली नाही.
यासंदर्भात वीर रेल्वे प्रशासनाकडे संपर्क साधला असता वीर रेल्वे स्थानकातून सेक्शन इंजिनिअर विभागीय अभियंता इलेक्ट्रीक कोकण रेल्वे चिपळूण यांच्याकडे या प्रकरणी अनेकवेळा या ठिकाणी होणाऱ्या विजेच्या गैरसोईबद्दल माहिती देण्यात आली. मात्र या गैरसुविधेकडे चिपळूण कार्यालयाकडून लक्ष देत नसल्याची माहिती वीर रेल्वे स्थानकातून प्राप्त झाली आहे.
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दादर-रत्नागिरी पॅसेंजर, रात्री १.४० वा. सावंतवाडी-मुंबई राज्यराणी तर सकाळी ४ वा. मुंबई-सावंतवाडी राज्यराणी या तीन गाड्या रात्रीच्या वेळी वीर रेल्वे स्थानकात थांबतात. पोलादपूर ते लोणेरे अशा या महामार्गालगत असलेल्या ४० किमी अंतरापर्यंत येणाऱ्या शेकडो गावातील या रात्रीच्या तीन गाड्यांमधून दर दिवशी ४०० ते ५०० प्रवासी ये-जा करतात. ८ वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या पॅसेंजर गाडीसाठी मिनीडोर वाहतुकीसाठी असतात. मात्र प्रवासी जास्त असल्याने या कमी पडतात. यामुळे बहुतांशी प्रवासी महामार्गावरच आपल्या प्रवासासाठी गाड्यांना हात करत असतात.
रात्री थांबणाऱ्या राज्यराणी या दोन गाड्यांच्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महामार्गावर जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत आहे.

Web Title: Passengers' arrival at Veer railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.