जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:38 IST2018-03-29T01:38:34+5:302018-03-29T01:38:34+5:30

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे समाजातील दानशूर लोकांकडून आलेल्या दानाचा सत्पात्री विनियोग व्हावा

One crore rupees for the Jalakit Shivar campaign in the district | जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी

जयंत धुळप  
अलिबाग : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे समाजातील दानशूर लोकांकडून आलेल्या दानाचा सत्पात्री विनियोग व्हावा; यासाठी समाजातील गरजू लोकांना आरोग्य व शिक्षण सुविधांसाठी मंदिर न्यास मदत देत असते. हा पैसा लोकांच्या उपयोगी यावा. लोकसेवेतच ईश्वर सेवा आहे, या ध्येयाने मंदिर न्यास कार्य करीत आहे, असे प्रतिपादन मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी बुधवारी येथे केले.
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणाऱ्या जलसंधारण कामांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे आर्थिक मदत दिली जाते. त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यास एक कोटी रु पयांच्या निधीचा धनादेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे आदेश बांदेकर यांनी सुपूर्द केला, त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत श्री सिद्धिविनायक न्यासाचे विश्वस्थ भारत परिख, आनंद राव, संजय सावंत, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, महेश मदलीयार, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, जि.प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, श्याम साळवी, उप जिल्हाधिकारी श्रीधर बोधे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकाºयांनी सुचवलेल्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद
श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासास धन्यवाद देऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी या वेळी बोलताना म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी कायापालट अभियान राबविले जात आहे.
त्यासाठी सरकारी दवाखाने व रु ग्णालयांमध्ये विविध सुविधांच्या पूर्ततेसाठीही मंदिर न्यासाने मदत करावी. जिल्ह्यात प्रत्येक गावात अभ्यासिका सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुस्तकांसाठी मंदिर न्यासाने साहाय्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यास बांदेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बांदेकर म्हणाले, गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी १९ लाख रुपयांचा निधी दिला होता, तर यावर्षी एक कोटी रु पये निधी दिला आहे. या शिवाय राज्यात सुरू असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाकरिताही न्यासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा कोटी रु पयांचा निधी सुपूर्द केला आहे.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींतील ५६ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या निधीतूनही रायगड जिल्ह्याला निधी मिळणार आहे. मंदिर न्यासातर्फे राज्यात १०२ डायलिसिस युनिट्स दिली जाणार आहेत. यातील रायगड जिल्ह्यासाठी १२ युनिट्स दिली जातील. त्यापैकी जिल्हा रु ग्णालय अलिबाग येथे चार, महाड उप जिल्हा रु ग्णालयाला चार आणि माणगाव येथील उप जिल्हा रु ग्णालयाला चार, अशा तीन ठिकाणी ही युनिट बसविण्यात येणार आहेत. या तीनही ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रेही बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात महामार्गालगत रु ग्णालय उभारण्याचा संकल्प
श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास रायगड जिल्ह्यात महामार्गालगत रु ग्णालय उभारण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच रायगड जिल्ह्यात सर्पदंश उपचार केंद्र सुरू करण्यासाठीही मंदिर न्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून कोणाही गरजू व्यक्तीला वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास श्री सिद्धिविनायक न्यासाच्या पोर्टलच्या लिंकवरून अर्ज करावा, असेही बांदेकर यांनी सांगितले.

Web Title: One crore rupees for the Jalakit Shivar campaign in the district