चला गाव वाचवू देश घडवू, रायगडमध्ये आदिवासी तरुणांचा ग्रामविकासाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 05:27 PM2018-01-19T17:27:15+5:302018-01-19T17:27:30+5:30

रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरुण- तरुणींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे.

Let the country save the village, the determination of rural development of tribal youth in Raigad | चला गाव वाचवू देश घडवू, रायगडमध्ये आदिवासी तरुणांचा ग्रामविकासाचा निर्धार

चला गाव वाचवू देश घडवू, रायगडमध्ये आदिवासी तरुणांचा ग्रामविकासाचा निर्धार

googlenewsNext

- जयंत धुळप
रायगड- रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरुण- तरुणींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांना अभिप्रेत असलेल्या गावाचा विकास कशा प्रकारे करता येईल, याचा विचार हे आदिवासी तरुण करू लागले असून, त्यांना मार्गदर्शन व सहकार्याची गरज आहे.
आदर्श गावाच्या निर्मितीस मोठा हातभार
महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांची 150 वी जयंती पुढल्या वर्षी साजरी केली जाणार असून, याची तयारी गांधीवादी विचारवंत करू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील चाफेवाडी या आदिवासी गावात युवा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये येथील आदिवासी युवकांना रोजगार निर्मितीसाठी नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.

ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण केला जाईल, याबद्दल येथील तरुणांनीच पुढाकार घेत विविध संकल्पना मांडल्या आहेत. या संकल्पनेतून आदर्श गावाच्या निर्मितीस मोठा हातभार लागू शकतो, असा विश्वास चाफेवाडीतील युवकांना आहे. चाफेवाडी येथील शिबिरासाठी जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते सुभाष पाटील व महाराष्ट प्रदेश सर्वोदय मंडळाच्या पदाधिकारी विमल मुंडे उपस्थित होत्या.

ग्रामीण तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिबीर
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांमध्ये जनजागृती करण्याचे काम शिबिरांच्या माध्यमातून रायगड जिल्हा सर्वोदय मंडळ, विनोबा मिशन, ग्रामीण लोकसेवा मंडळ, समता सार्वजनिक वाचनालय, विनोबा मिशन ग्रंथालय यांच्यावतीने केले जात आहे. त्यांच्याच पुढाकाराने चाफेवाडी येथील तरुणांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
-------------------------
चाफेवाडीच्या विकासासाठी शिबिरार्थी तरुणांनी केलेले कामांचे नियोजन
1.एकनाथ खंडवी, रंजना खंडवी - गावात सर्वोदय साहित्याचे ग्रंथालय सुरू करणार.
2.योगेश खंडवी, रंजना खंडवी - लहान मुले व महिलांसाठी काम करणार.
3.रविंद्र सांबरी, चंद्रकांत खंडवी- पर्यावरण, सेंद्रिय शेती, गोपालन, पर्यटन विषयक काम करणार.
4.राजेश ठोंबरे, सविता खंडवी - स्वच्छता, योग-प्राणायम, निसर्गोपचार, वनौषधी उद्यान प्रकल्प.
---------------------------
150 गांधी अभियानअंतर्गत राबविल्या जात असलेल्या युवा शिबिराचे घोषवाक्यच गाव वाचवू देश घडवू हे आहे. या उपक्रमास चाफेवाडी येथील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या उत्साहाला मदतीची गरज आहे. येथील युवकांच्या नवनवीन संकल्पनेतून आदर्श ग्राम व्यवस्था साकारू शकते. -सुभाष पाटील, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते

Web Title: Let the country save the village, the determination of rural development of tribal youth in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.