शेतकरी होणार मालामाल!
By Admin | Updated: May 5, 2016 00:46 IST2016-05-05T00:46:24+5:302016-05-05T00:46:24+5:30
रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख पुसण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने चंग बांधला आहे. भाताच्या पिकावरच अवलंबून न राहता नगदी पिके शेतकऱ्यांनी

शेतकरी होणार मालामाल!
- आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख पुसण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने चंग बांधला आहे. भाताच्या पिकावरच अवलंबून न राहता नगदी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. केरळची लाल केळी, हळद आणि त्यापाठोपाठ आता भुईमुगाच्या शेंगाचे पीक जिल्ह्यातील पोलादपूर, माणगाव आणि महाड तालुक्यात घेतले आहे. एक हजार एकराच्या माध्यमातून सुमारे १४ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडून शेतकरी मालामाल होणार आहेत.
जिल्ह्यात पूर्वी भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. भाताच्या पिकामुळे रायगड जिल्हा समृध्द होता. कालांतराने औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी या उद्योगामध्ये गेल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार मोठ्या संख्येनेही भाताच्या पिकावरच राहिली होती. त्यामुळे आर्थिक सुबत्ता येण्यात अडचणी निर्माण झाल्या. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा यासाठी त्यांनी नगदी पिकांकडे वळले पाहिजे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेने अलीकडच्या काळात प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी लोकमतला दिली.
भुईमुगाच्या पिकावर पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असायची त्याच पावलावर पाऊल ठेवत रायगड जिल्ह्यातील माणगाव, पोलादपूर आणि महाड तालुक्यात भुईमुगाचे पीक घेण्यात आले आहे. महाड तालुक्यात ७०० एकरावर, पोलादपूर तालुक्यात सुमारे २०० एकरामध्ये आणि माणगाव तालुक्यातील १० यासह अन्य ठिकाणी ९० एकरामध्ये भुईमुगाचे पीक घेण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
३० ते ३०० क्विंटल भुईमुगाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नसल्याने भुईमूग तोडणी यंत्र ५० टक्के अनुदानावर कृषी विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या यंत्राची किंमत ४८ हजार रुपये आहे. शेतकऱ्यांना फक्त २४ हजार रुपयांमध्ये हे यंत्र मिळणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भुईमूग
- भुईमुगाला बाजारामध्ये सुमारे सात हजार रुपये क्विंटल दर आहे.
- एका एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भुईमूग तयार होतो. त्याची किंमत एक लाख ४० हजार रुपये होते.
- सध्या एक हजार एकरावर हे पीक घेण्यात आले आहे. त्यानुसार १४ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे.
- महाड तालुक्यामध्ये सहा लाख रुपये किमतीची मिनी आॅईल मिलही उभारण्यात आली आहे.