हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृतीवर भर
By निखिल म्हात्रे | Updated: April 4, 2024 17:56 IST2024-04-04T17:55:57+5:302024-04-04T17:56:14+5:30
जैवविविधता जतन करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोन या चर्चासत्रातून सहभागींना मिळाला.

हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृतीवर भर
अलिबाग : जैवविविधतेची हानी आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृतीवर भर देण्याची ग्वाही आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियातर्फे अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी दिली.
जैवविविधता जतन करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोन या चर्चासत्रातून सहभागींना मिळाला. चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रा. महेश कांबळे, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतरच्या दोन सत्रांमध्ये डॉ. सतीश ठिगळे (भूगर्भशास्त्रज्ञ), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागाचे माजी प्रमुख दत्ताराम गोंधळी, सोशल अँड डिझास्टर मॅनेजमेंट असोसिएशनचे डॉ. नीलेश चांदोरकर, डॉ. किरण माळी या मान्यवरांनी मांडणी केली. चर्चासत्रामध्ये जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल अनुकूलन यांच्यातील परस्परसंबंध, प्रभावी धोरणे अमलात आणण्यासाठी सरकार, गैरसरकारी संस्था, स्थानिक समुदाय आणि इतर भागधारकांच्या प्रयत्नांच्या गरजेवर भर देण्यात आला.