तेलंगवाडीची विहीर बांधून पूर्ण
By Admin | Updated: June 24, 2016 03:43 IST2016-06-24T03:43:23+5:302016-06-24T03:43:23+5:30
तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीच्या आदिवासी ग्रामस्थांची पाणी डोक्यावर वाहून नेण्याची धडपड थांबली आहे. आदिवासी उपयोजनेच्या निधीमधून

तेलंगवाडीची विहीर बांधून पूर्ण
कर्जत : तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीच्या आदिवासी ग्रामस्थांची पाणी डोक्यावर वाहून नेण्याची धडपड थांबली आहे. आदिवासी उपयोजनेच्या निधीमधून तेलंगवाडीच्या ग्रामस्थ यांच्यासाठी असलेली जुनी विहीर तोडून तेथे नवीन विहीर बांधण्याचे काम आदिवासी उपयोजनेने पूर्ण केले आहे. तेलंगवाडीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरविण्यासाठी नळपाणी योजना जिल्हा प्रशासनाने राबविण्याची गरज आहे.
तेलंगवाडी ही आदिवासीवाडी एका टेकडीवर वसलेली आहे. वाडीमधील रहिवाशांंना पिण्याचे पाणी आणण्यासाठी टेकडी उतरून खाली पायथ्याशी असलेल्या विहिरीवर यावे लागते. ओलमण येथील ग्रामस्थ मालोजी पादिर आणि रामचंद्र पादिर यांनी ३० वर्षांपूर्वी आपल्या जमिनीमध्ये विहीर खोदण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी तेथे बांधलेली विहीर मोडकळीस आली होती आणि लहान आकाराच्या या विहिरीचे संरक्षक कठडे तुटून गेले होते. त्याचप्रमाणे विहीर बांधल्यापासून गाळ काढण्यात आला नसल्याने विहिरीमध्ये पाण्याचा साठा असून देखील त्याचा काही फायदा होत नव्हता. कारण विहिरीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिल्याने उन्हाळ्यात या तेलंग वाडीमधील आदिवासी महिलांची पाण्यासाठी धावपळ सुरु असायची. यामुळे आदिवासी उपयोजनेमधून तेलंगवाडीच्या विहिरींची दुरु स्ती व्हावी यासाठी या प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नानंतर तेलंगवाडीसाठी नवीन विहीर मंजूर झाली. नव्याने जुन्या विहिरीच्या ठिकाणी मोठी विहीर बांधताना ती अधिक खोल करुन ३० फूट व्यास असलेली नवीन विहीर बांधण्यात आली असून विहिरीची खोली अधिक वाढविल्यामुळे आता तेलंगवाडीच्या आदिवासी लोकांची पाण्याची समस्या कायमची संपली आहे. पाण्याचा भरपूर साठा तेथे तयार झाला असून आता त्या वाडीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडे हातात आणण्यासाठी नव्याने पावले उचलण्याची गरज आहे.