राजेश भोस्तेकर
अलिबाग : बीड मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येला व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडवर आल्यानंतर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत २९ ऑगस्टला आरक्षण मिळवून देणार ते पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत. किल्ले रायगडवरील शिवराज्याभिषेक निमित्त मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्येसह आरोपी बाबत बोलताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोक्का काढून देणार नाही, असे सांगत देशमुख यांच्या कुटूंबाने सुद्धा न्याय मिळण्याची आग्रही भूमिका घ्यावी असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचे सांगत आरक्षण कुणाच्या बापाची जहागिरी लागली नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ऑगस्टमध्ये मुंबई लाखो मराठा बांधवांनी जमावे, आरक्षण घेऊनच दाखवतो, कोण देणार नाही, आरक्षण आरक्षण द्यावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील कारभार सुस्थितीत व भय मुक्त राहावे यासाठी आपण किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजीराजे यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.