पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात पक्षात महत्त्वाचे घडामोडी पाहायला मिळाल्या. या सोहळ्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की, जयंत पाटील यांनी पत्र दिलं नाही आणि राजीनामाही दिलेला नाही. असं म्हणत त्यांनी खुलासा केला आहे.
जयंत पाटील यांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला असून, शरद पवार यांनी यावर निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जयंत पाटील यांनी केवळ आपला वैयक्तिक विचार मांडला आहे. पक्षात यावर सविस्तर चर्चा होईल. प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसेल, तर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.त्यापुढे म्हणाल्या, जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. एवढे वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही. त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील, तर ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यावर विचार केला जाईल. असं मतही सुळे यांनी मांडलं आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानानंतर पक्षात काय निर्णय घेतला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. जयंत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबत नात्याबद्दलही भाष्य करताना सांगितलं, अजित पवार आणि मी कुटुंब म्हणून नेहमी एकत्र आहोत. माझा आणि अजित पवारांचा प्रेमाचा पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतर याचा विषयी येत नाही आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. यात काही वाद नाही, माझ्यावर आणि पवार कुटुंबीयावर झालेले संस्कार आहेत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, राज्यभरात 'हुंडाबळी' प्रकरणावर जागरुकता निर्माण करण्यासाठी लवकरच दौरा करण्यात येणार असल्याची घोषणाही सुळे यांनी केली.