Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. मात्र, आता त्यांच्या शेवटच्या दिवसांतील मानसिक स्थितीबाबत त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत धक्कादायक आणि भावूक माहिती दिली आहे. "आता हे सगळं नको वाटतंय, बास झालं," अशी भावना अजित पवारांनी मृत्यूच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती, असा खुलासा गुजर यांनी केला आहे.
"तेच शेवटचं जेवण ठरलं..."
किरण गुजर यांनी अजितदादांसोबतच्या शेवटच्या भेटीच्या भावूक आठवणींना उजाळा दिला. "पाच दिवसांपूर्वी दादांशी बोलणं झालं होतं. ते खूप थकलेले वाटत होते. मला म्हणाले की, किरण, खूप कंटाळा आलाय, आपण दोघे कुठे तरी बाहेर जाऊया. आम्ही अर्धा दिवस बाहेर फिरलो, एकत्र जेवलो. पण ते जेवण आमच्या आयुष्यातील शेवटचं जेवण ठरेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्रवासात ते सतत म्हणत होते की, आता मला हे सगळं नकोसं वाटतंय. या सगळ्या गोष्टींचा (राजकारणाचा) मला खूप त्रास होतोय."
कामाची मरमर आणि टीकेची टोचणी
अलीकडच्या काही काळात अजित पवार राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांमुळे व्यथित झाले होते. निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने आणि विरोधकांच्या टीकेमुळे त्यांच्या मनाला खोलवर जखम झाली होती. याबद्दल गुजर सांगतात, "अजितदादा अत्यंत हळव्या मनाचे होते. ते मला म्हणायचे की, मी लोकांसाठी एवढं मरमर काम करतोय, रात्रंदिवस झटतोय, तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर तर ते विधानसभा लढायलाही तयार नव्हते, मीच त्यांचं मन वळवलं होतं. मी कुणाचं वाईट केलंय? मग लोक माझ्यावर आणि बारामतीमध्ये माझ्यावर टीका का करतात?' असा सवाल ते विचलित होऊन विचारायचे."
'करड्या' शिस्तीच्या माणसाचा बदललेला स्वभाव
अजित पवारांची ओळख नेहमीच एका शिस्तप्रिय आणि करड्या स्वभावाच्या नेत्याची राहिली. मात्र, वयोमानानुसार त्यांच्या स्वभावात मोठा बदल झाला होता, असे गुजर यांनी सांगितले. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्याने आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे सुरुवातीला दादांचा देवावर विश्वास नव्हता. "देवाने माझं काय केलंय?" असं ते पूर्वी विचारायचे. मात्र, अनुभवाने ते बदलले. त्यांच्यात श्रद्धा होती, पण अंधश्रद्धा नव्हती, असेही किरण गुजर म्हणाले.
Web Summary : Days before his death, Ajit Pawar told a close associate he was weary and wanted to escape politics, feeling burdened by criticism despite his hard work. He was deeply affected by recent political events.
Web Summary : अपनी मृत्यु से कुछ दिन पहले, अजित पवार ने एक करीबी सहयोगी को बताया कि वे थके हुए हैं और राजनीति से दूर भागना चाहते हैं, अपनी कड़ी मेहनत के बावजूद आलोचना से बोझिल महसूस कर रहे हैं। वे हाल की राजनीतिक घटनाओं से गहरे प्रभावित थे।