पक्षी विसाव्याचा ‘पिकनिक स्पॉट’ करणाऱ्यांना टोचणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:35+5:302021-01-08T04:27:35+5:30
पुणे : चीन ते दक्षिण आफ्रिका असा लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणारे अमूर फाल्कन पक्षी विश्रांतीसाठी लोणावळ्यात विसावले आहेत. पक्ष्यांना ...

पक्षी विसाव्याचा ‘पिकनिक स्पॉट’ करणाऱ्यांना टोचणार कोण?
पुणे : चीन ते दक्षिण आफ्रिका असा लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणारे अमूर फाल्कन पक्षी विश्रांतीसाठी लोणावळ्यात विसावले आहेत. पक्ष्यांना पाहण्यासाठीच अतिउत्साही नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. मात्र, आपली हौस भागवण्यासाठी पक्ष्यांच्या विश्रांतीमध्ये अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन पक्षितज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. पक्ष्यांचा विसावा म्हणजे ‘पिकनिक स्पॉट’ नव्हे, ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.
‘वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणारा पक्षी’ अशी खासियत असलेला अमूर फाल्कन हजारो किलोमीटरचे अंतर पार करत लोणावळ्यात विसावला. नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले आहे. काहीशी विश्रांती घेऊन हा पक्षी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने पुन्हा झेपावेल किंवा एव्हाना झेपावला असेलही. मात्र तोवरच अमूर फाल्कनला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली.
पक्ष्यांना पाहण्याची उत्सुकता, छायाचित्रणाचा छंद यामुळे गर्दी होते. विविध माध्यमांमधून पक्षी आल्याचे लोकांना समजते. उत्सुकता, कुतूहल वाटणे आणि लांबून पक्ष्यांचे निरीक्षण करणे ठीक आहे. मात्र, आपल्या उपस्थितीचा त्यांना त्रास होऊ नये, यासाठी लोकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. विसाव्याच्या ठिकाणी गर्दी केल्यास इतर पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होतो, असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले.
“पक्ष्यांच्या निरीक्षणाप्रमाणेच त्यांचा अधिवास, सवयी, स्थलांतर याबाबतचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. इला फाऊंडेशनतर्फे दरवर्षी पक्षिशास्त्र अभ्यासक्रम शिकवला जातो. यंदा हा कोर्स ऑनलाईन घेतला. त्यात शंभरपेक्षा जास्त पक्षीप्रेमी सहभागी झाले आहेत. पक्ष्यांबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे समाधान वाटते, असे डॉ. पांडे म्हणाले.
चौकट
विश्रांतीत व्यत्यय आणणे चूक
“थेट २ ते ४ हजार किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करणारे अमूर फाल्कन विश्रांतीसाठी लोणावळ्यात उतरले. त्यांच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणू नये,” असे मत पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. डॉ. पांडे म्हणाले, ‘‘अमूर फाल्कन गेल्या १५ वर्षांपासून पुण्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात येत आहेत. त्यामुळे ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास न थांबता करणाऱ्या पक्ष्यांना विश्रांतीची गरज असते. त्यांच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणणे चुकीचे आहे.”
-डॉ. सतीश पांडे, ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ