बेवारस वाहनांचा धनी कोण?
By Admin | Updated: January 12, 2017 02:35 IST2017-01-12T02:35:32+5:302017-01-12T02:35:32+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या, तसेच उपनगरांच्या विविध भागात

बेवारस वाहनांचा धनी कोण?
रावेत : गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या, तसेच उपनगरांच्या विविध भागात बेवारस अवस्थेत आढळणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. बेवारस आढळणाऱ्या वाहनांच्या संख्येने आता शेकडा पार केला आहे. दुचाकी, रिक्षा, कार, हलकी, तसेच जड वाहने रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेमध्ये बेवारसपणे पडलेल्या धूळखात, गंजलेल्या अवस्थेत आहेत. सदरची वाहने गेली अनेक दिवस त्याच अवस्थेत आढळली आहेत.
प्रशासनाने याची त्वरित दखल घेणे गरजेचे आहे. सदरची वाहने ताब्यात घेऊन तपासणी करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या, तसेच प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. बेवारस असलेल्या वाहनांचा उपयोग विघातक कार्यासाठी होऊ नये, याकरिता नागरिकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केलेल्या पाहणीमध्ये असे आढळून आले आहे, की शहराच्या निगडी, आकुर्डी, यमुनानगर, चिंचवड, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, प्राधिकरण परिसरामध्ये बेवारस वाहने आहेत. त्यांची सुरक्षा तपासणी होणे गरजेची आहे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.
रस्त्यालगत अथवा मोकळ्या जागेवरील उभ्या बेवारस वाहनांमुळे समस्या वाढू लागल्या आहेत. ही वाहने एखाद्या गुन्ह्यात वापरल्यानंतर लपवण्याच्या उद्देशाने उभी केलेली असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे वर्षानुवर्षे रस्त्यालगत पडून असणाऱ्या बेवारस वाहनाचा मालक कोण याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. शहरात विविध ठिकाणी रस्त्यालगत बेवारस स्थितीमध्ये पडून असलेल्या वाहनांची शोधमोहीम पोलिसांत सुरू करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीला शहरात अनेक ठिकाणी अशी बेवारस वाहने उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यालगत, पदपथावर तसेच मोकळ्या मैदानात ही वाहने मोठ्या संख्येने उभी आहेत. त्यापैकी बहुतांश वाहने वर्षानुवर्षे एकाच जागी पडून असतानाही ती हटवण्याचा प्रयत्न झालेला नाही, तर काही अपघातग्रस्त वाहने घटनास्थळीच पडून राहिल्याने त्यांचे टायर अथवा उपयुक्त पार्ट नाहीसे झालेले आहेत.
अनेकदा वाहन हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तक्रार देऊन विमा कंपनीकडून नफ्याची रक्कम लाटण्याच्या उद्देशाने देखील वाहने बेवारस स्थितीत अज्ञातस्थळी उभी केली जाण्याची शक्यता असते. अशी वाहने थोडीफार सुस्थितीत असतानाही त्याची ओळख पटू नये, याकरिता नंबर प्लेट काढलेली असते.(वार्ताहर)