शिवसेनेचे शिणलेले शिलेदार तळपणार कधी?

By Admin | Updated: February 3, 2017 04:25 IST2017-02-03T04:25:40+5:302017-02-03T04:25:40+5:30

सभागृहात अवघे १५ सदस्य, त्यातील तिघे विविध कारणांनी गळालेले, संघटनेचे बळ यथातथाच, नाव असलेले बहुतेक शिलेदार शिणलेले, त्यामुळेच गेल्या ५ वर्षांत शिवसेनेची

When did Shivsena leek leek leeked ever? | शिवसेनेचे शिणलेले शिलेदार तळपणार कधी?

शिवसेनेचे शिणलेले शिलेदार तळपणार कधी?

पुणे : सभागृहात अवघे १५ सदस्य, त्यातील तिघे विविध कारणांनी गळालेले, संघटनेचे बळ यथातथाच, नाव असलेले बहुतेक शिलेदार शिणलेले, त्यामुळेच गेल्या ५ वर्षांत शिवसेनेची संघटनात्मक वाढ झालीच नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने अंग झटकले आहे; पण आळस गेलेला दिसत नाही.
काँग्रेसमधून स्वगृही परतलेल्या विनायक निम्हण यांना पक्षप्रमुखांनी थेट शहरप्रमुखाची जबाबदारी दिली. त्यांनीही जुन्या खाक्या दाखवीत शहरभर भ्रमण सुरू केले. जुन्या शिवसैनिकांचा त्यांच्यावर पक्ष सोडल्याबद्धलचा राग, त्यात परतल्यावर त्यांना थेट शहरप्रमुख केलेले. त्यामुळे हवे तसे सहकार्य त्यांना मिळत नव्हते. तरीही निम्हण यांनी नेटाने पक्षबांधणी सुरू केली.
स्वबळाचा नारा देत निम्हण यांनीच पक्षातील युवकांना सक्रिय केले. परिवर्तन मोर्चा काढला. तो काढताना मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीवरही टीका करण्याचे धाडस दाखविले. ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार यांचेही सहकार्य त्यांनी मिळवले. राज ठाकरे यांनी मनसे नावाचे स्वतंत्र ठाणे निर्माण केल्यानंतर संपलेले बाळसे पुण्यातील शिवसेना धरू लागली होती; मात्र कुठेतरी माशी शिंकली व निम्हण यांचा धडाका शांत होत गेला. त्यामागे वैद्यकीय कारण असल्याचेही सांगण्यात येते. दरम्यानच्या काळात संपर्कप्रमुख म्हणून मुंबईतून डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती झाली. त्यामुळेही त्यांनी रस कमी असल्याची चर्चा आहे. आंदोलन वगैरे सुरू झालेल्या गोष्टी एकदम कमी झाल्या.
पालिकेतील शिवसेनेचीही निम्हण यांना हवी तशी साथ मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. मावळत्या सभागृहात शिवसेनेचे संख्याबळ १५ असे होते. त्यातील तीन सदस्यांचे सदस्यत्वच रद्द झाले. उर्वरित १२ जणांकडून मागील ५ वर्षांत संघटनेला उपयोगी होईल असे फारसे काहीही झाले नाही. राज्यात शिवसेनेकडे लहान भावाची भूमिका अलीकडे आली. त्यापूर्वीच पुणे महापालिकेत सेनेने त्या भूमिकेत प्रवेश केला होता. त्यामुळे पुण्यात शिवसेनेचे अनेकदा भाजपाबरोबरच झालीच तर फरफटच झाली. स्वतंत्र भूमिका घेत सभागृह गाजवणे असे शिवसेना नगरसेवकांकडून झाले नाही. त्यामुळे एकप्रकारचे मवाळपण शिवसेनेच्या अंगी आले.
महापालिका निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर भाजपने शिवसेनेला राज्यात खेळविले जाते त्याप्रमाणेच खेळविण्यास सुरुवात केली. आम्ही युतीचे आग्रही आहोत असे पदाधिकारी सांगत होते, तर जाहीर मेळाव्यांमधून कार्यकर्ते युती नकोचा पुकारा करीत होते. त्या वेळी युती आम्हालाच नको, असा आवाज शिवसेनेने दिला. युती खरोखरच तुटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा जोश निर्माण झाला. (प्रतिनिधी)

वाटचाल सुसह्य होणार कशी?
मनसेच्या राज ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण असलेला एक वर्ग अद्यापही शिवसेनेत आहे. शिवसैनिकांच्या स्तरावर तसे काही जण आहेत. युती तुटल्यावर मनसेकडून शिवसेनेला टाळीसाठी हात पुढे केल्यावर शिवसैनिकांमधील हा गट सुखावला होता; पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळी देणे नाकारले. त्यामुळे शिवसेनेला आता निवडणुकीत एकाकी वाटचाल करावी लागणार आहे. मुंबईत ते ठीक आहे; पुण्यात मात्र आळसावलेले, थकलेले शिलेदार धडाडीने उठले तरच ही वाटचाल सुसह्य होणार आहे. हे थकलेले शिलेदार तळपणार तरी कधी, असा प्रश्न आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

युती तुटल्यानंतर अपेक्षित उत्साह नाही
शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यानंतर शिवसेनेमध्ये इतर ठिकाणांप्रमाणे अपेक्षित उत्साह दिसत नाही. युतीमुळे अनेक कार्यकर्त्यांची संधी नाकारली गेली होती. पुण्याच्या अनेक प्रभागांमध्ये संधी मिळत नसल्याने कार्यकर्तेच तयार होत नव्हते. त्यामुळे पक्षाची वाढ खुंटली असल्याची खंत नेते खासगीत करत होते. यंदाच्या वेळी मात्र सर्व जागांवर उमेदवार उभे करता येणार आहेत.

उद्धव ठाकरे यांचे फार लक्ष नाही
मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याने पुण्याकडे उद्धव ठाकरे यांचे फार लक्ष नाही, अशी खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते एकदाही पुण्यात आलेले नाहीत.

Web Title: When did Shivsena leek leek leeked ever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.