आम्ही कर भरतो, तशा सुविधाही द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:38+5:302021-06-09T04:14:38+5:30
निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पिरंगुट परिसरातील उद्योग विखुरलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. ऑटोमोबाइल, केमिकल, ...

आम्ही कर भरतो, तशा सुविधाही द्या!
निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पिरंगुट परिसरातील उद्योग विखुरलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. ऑटोमोबाइल, केमिकल, फूड इंडस्ट्रीमधील अनेक नामांकित कंपन्याही येथे आहेत. मात्र, या ठिकाणी एमआयडीसी नसल्याने आम्हाला सुविधा मिळत नाही. कारखान्यांपर्यंत जायला अंतर्गत रस्ते नाहीत. पायाभूत सुविधा नाहीत, असे असले तरी आम्ही कोट्यवधींचा कर ग्रामपंचायत तसेच प्रशासनाला देतो. त्याप्रमाणे आम्हाला सुविधाही द्या, अशी मागणी मुळशी तालुका इंडस्ट्री असोसिएशनने प्रशासनाला केली आहे.
मुळशी तालुक्यात पिरंगुट, माण, हिंजवडी या ठिकाणी उद्योग आहेत. एकट्या पिरंगुट परिसरात ७०० ते ८०० कंपन्या कार्यरत आहेत. यात अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. पिरंगुट परिसरात या कंपन्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत. या ठिकाणी आैद्योगिक वसाहत नसल्याने या परिसराचा योग्य विकास झालेला नाही. येथील कंपन्या पाणी, वीज, दळणवळणासाठी चांगले रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. मुख्य रस्त्यावर असलेल्या कंपन्यांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. मात्र, आत असलेल्या कंपन्यांपर्यंत जायला चांगले रस्ते नाहीत. काल झालेल्या दुर्घटनेमुळे रस्त्यांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आला. अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठीही रस्ता नसल्याने अडचणी आल्या. या बाबतच्या अनेक तक्रारी मुळशी तालुका इंडस्ट्री असोसिएशनने प्रशासनाकडे केल्या. मात्र, त्यांची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. आगीच्या घटना नियमित होत असतात. यामुळे अग्निशमन केंद्र जवळच असणे गरजेचे आहे. ते पण नाही. एखादी तक्रार करायची असल्यास उद्योगांना अभय देणारी एकही यंत्रणा कार्यरत नाही. यामुळे काही समस्या उद्भवल्या की कंपन्यांना प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलिसांना गाठावे लागते. अनेकदा त्यांच्याकडूनही समस्यांचे निराकरण होत नाही. यामुळे येथील उद्योग इतरत्र स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत.
--
चौकट
पिरंगुट येथील कंपन्यांकडून सात ते आठ हजार करोड रुपयांची होते उलाढाल
पिरंगुट येथे अनेक नामवंत कंपन्या आहेत. या कंपन्यांचा या परिसराच्या विकासात मोलाचा वाटा आहे. बहुराष्ट्रीय कंपन्याही या ठिकाणी आहे. या कंपन्यांकडून कोट्यवधींचा कर प्रशासनाला दिला जातो. कारखान्यांच्या व्यवहारामुळे सात ते आठ हजार कोटींची उलाढाल होत असते. जवळपास २५ ते ३० हजार कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत. या ठिकाणी आणखी सुविधा मिळाल्या तर या उलाढालीत आणखी वाढ होणार आहे. तसेच रोजगार निर्मितीही वाढणार आहे.
कोट
मुळशी तालुक्यातील आैद्योगिक वसाहतीत पिरंगुट भागात जवळपास ५०० ते ७०० लहान मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये वर्षभरामध्ये आग व अन्य अपघातांच्या घटना वारंवार घडत असतात. यातील मोठ्या कंपन्यांमध्ये स्वत:ची सुरक्षा व्यवस्था असली तरी लहान कंपन्यांमध्ये मात्र, अपघात नियंत्रणाच्या व्यवस्था नसल्याने कालच्यासारख्या आगीच्या घटना घडतात. त्यामुळे कंपन्यांच्या वतीने प्रशासनाकडे सातत्याने अग्निशमन केंद्र व आपत्ती व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत.
- सतीश करंजकर, अध्यक्ष, मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशन
कोट-
काल झालेली आगीची घटना दुर्देैवी आहे. इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने आम्ही कपन्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात याबाबत प्रशासनाला निवेदन देणार आहोत. या संदर्भात आम्ही आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- रमण गोवित्रीकर, सचिव, अध्यक्ष मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशन