पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबर एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही; त्यामुळे या विषयावर चर्चाही नाही व पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात हा विषयही नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
पक्षाचा वर्धापनदिन बालेवाडी क्रीडासंकुलात १० जूनला होणार आहे. त्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी म्हणून तटकरे पुण्यात आले होते. आमदार चेतन तुपे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे, सूरज चव्हाण, संजय बोरगे, संजय तटकरे, सुरेश घुले, योगेश बहल, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. अजित पवार यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने मतांची मोहोर उमटवली. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. आमचा पक्ष सरकारचा महत्त्वाचा घटक आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकांना सामोरे जाऊ, त्याआधी प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका अशी संस्थानिहाय चर्चा होईल व त्यानंतरच कोणाला किती जागा याचा निर्णय घेतला जाईल.’
पक्षाचा वर्धापनदिन हा पुढील दिशा ठरवण्यासाठी व मागील कामगिरीचे अवलोकन करण्यासाठी असतो. १० जूनला अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व नेते, मंत्री, पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे नेते असतात. त्यामुळे त्यांची उपस्थिती असणारच आहे. सर्वांबरोबर संवाद साधून पक्षाची आगामी दिशा निश्चित केली जाईल. नागरिकांसाठीही हा वर्धापनदिनाचा कार्यक्रम खुला आहे, त्यांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन तटकरे यांनी केले.