पुणे : शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारी अनेक संकटे आली तरी अविश्रांत सुरूच आहे. उन्हाळे, पावसाळे, कितीही संकटे आली तरी न चुकता सुरूच आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी विश्वस्तांच्या वागणुकीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांमध्ये नाराजी असली तरी भाष्य न करता मौनातूनच कोरडे ओढले. विश्वस्त हे केवळ व्यवस्था असून, पंढरीची वारी ही अवस्था आहे. या प्रकारामुळे सज्जन सोहळ्याला असज्जनतेचे गालबोट लागू नये, अशी अपेक्षा वारकरी व्यक्त करत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यात विसावल्यानंतर विश्वस्त योगी निरंजन यांच्या वागणुकीवरून वादंग निर्माण झाला. यानंतर निरंजननाथ यांनी खुलासा करत माफी मागण्याचा प्रयत्न केला. सोहळा प्रमुख भावार्थ देखणे यांनीही यावर पडदा टाकत असे प्रकार यापुढे घडणार नाहीत, अशी ग्वाही दिली. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांसह अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. वारकऱ्यांनी याबाबत कोणतेही भाष्य न करता त्यांनी मौनातूनच कोरडे ओढले आहेत.वारी ही शेकडो वर्षांपासून सुरू आहे. अनेक उन्हाळे, पावसाळे तसेच कोरोनासारखी संकटे आली तरी वारी सुरूच आहे. त्यामुळे असे प्रकार केवळ पेल्यातील वादळच ठरत आहेत. वारकऱ्यांना राजकारणात काडीचाही रस नाही. विश्वस्त मानकरी आणि प्रशासनामधील अंतर्गत वाद, हेवेदावे त्यांनी सोहळ्यात आणू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
मंदिराच्या व्यवस्थेसाठी साठ वर्षांपूर्वी संस्थानाची स्थापन करण्यात आली. दर पाच वर्षांनी बदलणारी विश्वस्त ही व्यवस्था आहे. तर सोहळ्यामध्ये न चुकता वंशपरंपरागत योगदान देणारी समांतर व्यवस्था त्यापूर्वीपासूनच कार्यरत आहे. त्यामुळे विश्वस्तांनी अशा प्रकारचे वाद ओढवून घेऊ नयेत. कार्यकाळ संपल्यानंतर अनेक विश्वस्त पायी वारीत दिसतही नाहीत. अनेकांच्या घराण्यात पायी वारीचा इतिहासही नाही. त्यामुळे वारीमध्ये असे वाद निरर्थक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. वारीमध्ये पालखी मुक्कामी विसावल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती केली जाते. त्यानंतर कोणत्याही दिंडीमध्ये स्वतंत्र आरती केली जात नाही. मात्र, योगी निरंजननाथ यांनी या प्रकारानंतर सारवासारव करताना माउलींच्या आरतीनंतर दिंडीकऱ्यांना आपापल्या दिंडीत आरती करायची असल्याने विलंब होत असल्याचा दावा केला होता. मात्र, विसाव्याची आरती झाल्यानंतर पुन्हा आरती करतात का, असा सवालही केला. माहिती घेऊनच वारीबाबत वक्तव्य करावे, अशी अपेक्षाही वारकरी व्यक्त करत आहेत.
पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याच्या दिवशी गुरुवारची पालखी काढली जाते. गेली अनेक वर्षे अशी पालखी दुपारी काढण्याची प्रथा आहे. याबाबत कोणताही लिखित नियम नाही. मात्र, काही जणांच्या आग्रहास्तव पालखी उशिरा काढल्याने रात्री विसाव्याला उशीर झाला. परिणामी दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याकडे प्रस्थान ठेवताना पालखी एक तास उशिरा मार्गस्थ झाली. या प्रकाराबाबतही वारकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे काहींच्या सांगण्यावरून वारीच्या परंपरेला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.