आदिवासी भागाला पाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: April 29, 2017 03:47 IST2017-04-29T03:47:42+5:302017-04-29T03:47:42+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या

आदिवासी भागाला पाण्याची प्रतीक्षा
डिंभे: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन पुणे व नगर जिल्ह्यातील भाग सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु प्रकल्पासाठी जमिनी देऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे भूमिपुत्र मात्र अजूनही डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली अनेक पुनर्वसित गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांची वानवा आहे.
काही कुटुंबे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या प्रकल्पामुळे देशोधडीला लागलेल्यांना आपल्या पुढील पिढीला तरी एक ना एक दिवस डिंभे धरणाचे पाणी चाखावयास मिळेल, या आशेवर जगत आहे. मात्र चार दशके सरली अजून तरी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. डोंगराच्या तळाशी पाणी दिसत आहे. मात्र त्याचा जीवनात उपयोग होत नसल्याने या भागातील जनता कासावीस झाली आहे.
धरण प्रकल्प उभा राहिल्यापासून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र अजून तरी या मागणीला मूर्त रूप आले नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभेच्या सिंचनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ््यात हजारो मिमी पाऊस पडतो. या पाण्याच्या जोरावर डिंभे बुद्रुक येथे सन १९७२ मध्ये घोड नदीवर सुमारे ८५२ मीटर लांबीचे व ७२ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. १३.५० टीएमसीएवढे पाणी साठवणक्षमता असणाऱ्या या धरणामुळे नगर व पुणे जिल्हयातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
११६ किमी लांब असणाऱ्या उजव्या कालव्याद्वारे आंबेगाव व शिरूर तालुक्यातून अनुक्रमे ८६६१ व ६९०७ सिंचनक्षेत्र प्रस्तावित झाले आहे. या धरणासाठी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, वचपे, कळंबई, फुलवडे, बोरघर, माळीण, अडिवरे, पंचाळे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी आदी आदिवासी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन धरणाच्या पाण्यात बुडाली. या गावांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे बेरोजगार होऊन कायमची निराधार झाली आहेत.
डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. तर मग आमच्याच हक्काचे पाणी अम्हाला का मिळू नये? वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भुमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आसल्याने शेतकरीवर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे.
(वार्ताहर)