पुणे - राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार असून, प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबविली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. औंध येथे महाऊर्जाच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाऊर्जासाठी दोन मोठी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर आणणे आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून प्रथम टप्प्यात १०० युनिट व दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना सौर ऊर्जेवर आणणे. तसेच दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्यांचे देयक शून्यावर आणण्याचा प्रयत्न असून, महाऊर्जा या उद्दिष्टांवर काम करेल. २० वर्षांत वीजदर सरासरी ९ टक्क्यांनी वाढले असल्याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले की, २०२५ ते २०३० दरम्यान वीजदर कमी करण्याचा प्रयत्न आहे. दोन वर्षांत देशभरात ४ लाख सौर कृषिपंप बसविण्यात आले असून, महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी प्रकल्पांतर्गत १६,००० मेगावॉट क्षमतेचे फीडर २०२६ पर्यंत सौर ऊर्जेवर आणले जातील.