उजनीचा वाद न्यायालयात जाणार
By Admin | Updated: June 18, 2014 00:33 IST2014-06-18T00:33:28+5:302014-06-18T00:33:28+5:30
कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय उजनी बचाव समितीने रविवार (दि. १५) रोजी पळसदेव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला

उजनीचा वाद न्यायालयात जाणार
लोणी देवकर : उजनी धरणातील एकूण ६३.५० टक्के पाणीसाठा राखीव ठेवावा, धरणातील पाण्याची पातळी वजा पातळीच्या खाली जाऊ न देण्यासाठी शासनाने दर वर्षी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, धरणाच्या पाणी प्रदूषणात होणारी वाढ रोखावी, दर वर्षी उजनी धरणग्रस्तांना पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष थांबावा. यासाठी शांततेच्या मार्गाने लढा देण्याचा निर्णय उजनी बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय उजनी बचाव समितीने रविवार (दि. १५) रोजी पळसदेव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला.
दर वर्षी उजनीच्या पाण्यावरून उद्भवणाऱ्या वादाला कंटाळून आता उजनी बचाव समितीच्या वतीने हा वाद न्यायालयात सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ११७ टीएमसी क्षमता असलेल्या उजनी धरणातील ६३.५० टक्के पाणीसाठा राखीव आहे. मात्र, दर वर्षी ही मर्यादा तोडून पाणी सोडले जाते.
उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असल्याने ‘पिण्यासाठी पाणी सोडा’ या नावाखाली मोठ्याप्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात येते. परिणामी, याचा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो.
भरलेले होते, मात्र तरीही आज स्थितीला उजनी धरण वजा पातळीवर गेले आहे. उजनी धरण व्यवस्थापकाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना मोठ्याप्रमाणात बसत आहे. उजनीतील पाण्याच्या सिंचनासाठी ९.६ टीएमसी ,कालवा सिंचन ३२.१५टीएमसी, कन्हेर सिंचन ३.१५ टीएमसी, सिना माडा उपसासिंचन ४.७५ टीएमसी, शिरपूर उपसा सिंचन योजना १.७३ टीएमसी, आष्टी उपसा सिंचन योजना १ टीएमसी, एकरूख उपसा सिंचन योजना ३.१८ टीएमसी, बार्शी उपसा सिंचन योजना २.५९ टीएमसी, सांगोला उपसासिंचन योजना २ टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना १.८१ टीएमसी, अशा प्रकारे योजनांसाठी पाणी देण्याचे नियोजन कागदोपत्री करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पाणी राजकीय दबावापोटी सोडण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येत आहे. यासोबत उजनी धरणावर यापेक्षाही मोठ्या क्षमतेच्या पाणी योजना प्रस्तावित आहेत.
या वेळी शिवसेनेचे विशाल बोंद्रे, काकासाहेब मांढरे, अॅड. महेश ढुके, मधुकर रंधवे, पळसदेवचे माजी सरपंच अनिल खोत, अरविंद जगताप, एकनाथ शेलार, संपत काळे, जगन्नाथ काटे, शिवाजी गलांडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी, पवार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)