मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: January 29, 2017 03:53 IST2017-01-29T03:53:06+5:302017-01-29T03:53:06+5:30
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या अकलूजकडे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री पावणेबाराला ही दुर्घटना घडली.

मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या अकलूजकडे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री पावणेबाराला ही दुर्घटना घडली.
दिग्विजय सुभाष लोखंडे (वय १९, रा. बार्शी, जि. सोलापूर), संदीप दशरथ ढवळे (वय २०, रा. जामखेड, जि. नगर), अभिजित गुणवंत पाटील (वय २०, रा. नातेपुते, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. यासंदर्भात भीमराव काशिनाथ नलवडे (रा. अकलूज, सोलापूर) यांनी इंदापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे ठाणे अंमलदार अजीज शेख यांनी सांगितले, की फिर्यादी व मृत अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेतात. ते रूममेट आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हे सर्वजण दुचाकीवरून दूध पिण्यासाठी अकलूज येथील गांधी चौकात आले. दूध पिल्यानंतर शेजारी असलेल्या दुकानाकडे गेले. त्यावेळी अभिजित पाटील याचा मोबाईल दूध घेतल्याच्या ठिकाणी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो आणण्यासाठी ते तेथे गेले तेव्हा मोबाईल बालाजी ट्रॅव्हलच्या चालकाने नेला असून तो वैष्णवी ढाब्यावर जेवण करण्यास थांबणार असल्याचे या चौघांना समजले. फिर्यादी नलवडे खासगी गाडीने, तर इतर तिघे जण दुचाकीवरून इंदापूरकडे निघाले. ११ वाजता वैष्णवी ढाब्यावर जाऊन ट्रॅव्हलच्या चालकाकडून त्यांनी मोबाईल ताब्यात घेतला. अकलूजकडे परतत असताना मारकड कुस्ती केंद्राजवळ पुण्याकडून भरधाव वॅगनर मोटारीने धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी इंदापूरहून अकलूजकडे जाताना त्याचा इंदापूरमधील मित्र मनोज म्हेत्रे याच्या दुचाकीवर होता. मृत झालेले तिघे एकाच दुचाकीवर बसले होते. मोटारीने तिघे जण बसलेल्या दुचाकीस धडक दिली. मोटारचालक अनंत अंधारे (रा. अकलूज) हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)