पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात आपले नगरसेवक विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मनसेचा फॅक्टर पुण्यात चाललाच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे किशोर शिंदे यांनी कोथरूडमधून, तर कसब्यातून रवींद्र धंगेकर यांनी जोरदार लढत देऊन दुसऱ्या क्रमाकांची मते मिळविली होती. खडकवासल्यातून रमेश वांजळे हे निवडून आले होते. या वेळी मनसेचे तिन्ही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पंचरंगी लढतीत मनसेचे गठ्ठा मतदान निकाल फिरवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मनसेची लाट आलीच नाही. राज ठाकरे यांनी पुण्यात एकमेव सभा घेतली होती; परंतु त्यानंतरही वातावरण तयार झाले नाही. मनसेमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात काम करण्याचे प्रकारही घडल्याची चर्चा आहे. युती ऐन वेळी तुटल्याने भाजपाकडे उमेदवार तयार नव्हते; मात्र ऐन वेळी उमेदवारी दिलेल्यांना पक्षाकडून मोठी ताकद देण्यात आली. इतर पक्ष यामध्येच प्रामुख्याने कमी पडले. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारात उतरले; मात्र त्यांच्याकडे फारसे मुद्दे नव्हते. राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभाही होऊ शकल्या नाहीत.राष्ट्रवादी कॉँग्रेसने कसब्यातून ऐन वेळी दीपक मानकर यांना उमेदवारी दिली; मात्र पक्षाची मते त्यांच्याकडे फिरू शकली नाहीत. इतर ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेस गांभीर्याने लढलीच नाही, असे चित्र होते. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडवरच लक्ष केंद्रित केले होते. पुण्यात त्यांनी बैठकाही घेतल्या नाहीत.
पुण्यात मनसे फॅक्टर चाललाच नाही
By admin | Updated: October 19, 2014 22:34 IST