शिरूर तालुक्यात यंदा पुरेसा पाणीसाठा
By Admin | Updated: May 7, 2014 04:25 IST2014-05-06T18:16:05+5:302014-05-07T04:25:46+5:30
मे महिना उजाडला असला, तरी सुदैवाने शिरुर तालुक्यात अद्याप पाणी टँकरचा एकही प्रस्ताव नसल्याचे चित्र आहे.

शिरूर तालुक्यात यंदा पुरेसा पाणीसाठा
शिरूर : मे महिना उजाडला असला, तरी सुदैवाने तालुक्यात अद्याप पाणी टँकरचा एकही प्रस्ताव नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षात मात्र ११ गावे १४८ वाड्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता.
तालुका तसा २००५पासून बर्यापैकी टँकरमुक्त झाला आहे. मात्र, २०१२मधील कमी पर्जन्यमानामुळे २०१३मध्ये पाण्याची टंचाई भासली आणि पर्यायाने ११ गावे १४८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. २०१३मध्ये मात्र सरासरी पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई दूर झाली. धरणे भरल्याने धरणांचे पाणीही मिळाले. याचा परिणाम होऊन या वर्षी मे महिना उजाडला, तरी टँकरचा प्रस्ताव नसल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले.
तालुक्याची दुष्काळी ओळख २००५मध्ये पुसली गेली. कारण चासकमान, डिंभे प्रकल्पाचे पाणी तालुक्याला मिळाले. त्याआधी अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून गणल्या जाणार्या या तालुक्याला पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. २००२ ते २००४चा दुष्काळ हा १९७२पेक्षा भयाण होता, असे दुष्काळ भोगलेली माणसे सांगतात. सुदैवाने २००४, २००५मध्ये चांगला पाऊस झाला. प्रकल्पांचे पाणी मिळाले. तालुका दुष्काळमुक्त झाला.
धरणांत पाणी कमी असले व पाऊसही अत्यल्प झाल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागते. प्रकल्पांचा लाभ मिळत नसणार्या पश्चिम भागातील काही गावे मात्र आजही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. मागील वर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. मात्र, आवर्तने मिळालेली गावे वगळता तालुक्यातील ११ गावे १४८ वस्त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. सुदैवाने या वर्षी मे उजाडला, तरी या भागातील एकही प्रस्ताव (टँकरसाठी) नाही. केवळ वाडापुनर्वसन येथील विहीर अधिग्रहणसंदर्भातला प्रस्ताव झाला आहे.