पाणी साचल्याने अडली वाहतूक
By Admin | Updated: June 24, 2015 05:22 IST2015-06-24T05:22:26+5:302015-06-24T05:22:26+5:30
सतत कोसळणारा पाऊस आणि सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहनांचा वेग मंदावल्याने मंगळवारी शहरभरात

पाणी साचल्याने अडली वाहतूक
पिंपरी : सतत कोसळणारा पाऊस आणि सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहनांचा वेग मंदावल्याने मंगळवारी शहरभरात अनेक भागांत वाहतूककोंडीचा सामना करण्याची वेळ शहरवासीयांवर आली. एकीकडे हैराण करणारा पाऊस आणि दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक पुरते हैराण झाले. वाहतूककोंडी सोडविण्यात पोलिसांची पुरती भंबेरी उडाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
सलग तिसऱ्या दिवशी शहरामध्ये संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावरून घसरण्याच्या भीतीपोटी वाहनचालक विशेषत: दुचाकी चालकांकडून वाहने सावकाश चालविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याखाली असणारे खड्डे, गटारांच्या खचलेल्या जाळ्या अशा ठिकाणी वाहने खड्ड्यांत आदळणे, काही वेळा ती अडकून पडण्याच्या लहान दुर्घटनांचा अनुभव चालकांना येत आहे. त्यामुळे वाहनांचे कोणतेही नुकसान होणे टाळण्यासाठी वाहनचालकांना सावकाशीने वाहने चालवावी लागत आहेत.
सतत बरसणाऱ्या पावसामुळे शहरामधील मुख्य रस्त्यांसह अनेक लहान रस्त्यांवरील सखल भागांत पाणी साचले होते. परिणामी, या पाण्यातून दुचाकी काढण्याची कसरत चालकांना करावी लागत होती. प्लगला पाणी लागल्याने अथवा सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुचाकी बंद पडल्याचे प्रकार अनेक भागांत पाहण्यास मिळाले. फूटभर साचलेल्या पाण्यातून मोटारी काढण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात त्या काही वेळ बंद पडल्याने पुढे ढकलून काढण्याची वेळ चालकांवर आल्याचे प्रकार ठिकठिकाणी घडले. या सर्वच प्रकारांमुळे वाहतूक व्यवस्थेवर सकाळपासूनच विपरीत परिणाम झाला.
पिंपरीतील वर्दळीच्या मोरवाडी चौक, इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळच्या वैशालीनगर, नेहरुनगरच्या संतोषी माता चौक, पिंपरी कॅम्प, चिंचवडच्या ग्रेड सेपरेटर, चिंचवड गावठाण, निगडी, आकुर्डी, कासारवाडीतील शंकरवाडी भुयारी मार्ग, नाशिक फाटा चौक, भोसरीतील महादेव मंदिराजवळचा चौक, भोसरी-चऱ्होली रस्त्यावर ओढ्याच्या सखल ठिकाणी झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी भर पावसात खटाटोप करण्याची वेळ पोलिसांवर आली. कितीही प्रयत्न केला, तरी मोकळ्या रस्त्याने वेगात येणाऱ्या आणि पाणथळ जागी थबकणाऱ्या वाहनांमुळे ही कोंडी सोडविणे शक्य होत नव्हते. दुपारी २पर्यंत हीच स्थिती कायम होती.
दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरवासीयांना थोडासा दिलासा मिळाला. सायंकाळी ४.३० नंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळ्यास सुरुवात झाली. सकाळच्या दयनीय परिस्थितीचीच पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. (प्रतिनिधी)