माळेगाव : चांगल्या कारभाराची टिमकी वाजवणाऱ्या सत्ताधारी संचालक मंडळाने पाच वर्षे सत्तेत असताना नावलौकिक असलेल्या कारखान्याचे होत्याचे नव्हते केले. यामुळेच उपमुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची वेळ आली. सहकार जिवंत ठेवण्यासाठी, खाजगी विरुद्ध सहकार बचावासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरावागज (ता.बारामती) येथे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले की, माळेगावची अवस्था दयनीय झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामामुळे गाळप कमी झाले. उसाचा दर २८०० रुपये दिल्याने अधिकचा ऊस न मिळाल्याने इतर ऊस मिळु शकला नाही. माळेगावला ११ गावे जोडुन सभासदाचे हक्क हिरावून घेण्याचे महापाप सत्ताधारी करत होते. मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव हाणून पाडला. आता जागे व्हावे लागले असे म्हणत सहकार जिवंत ठेवायचा आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे परीस आहेत. स्वाभिमानी सभासद कारखान्याचा कणा असल्याचे माजी अध्यक्ष तावरे म्हणाले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभारावर सडकून टीका केली. आम्ही कारखान्याचे एक्सापांशन केले मात्र त्या विरोधात आत्ताची सत्ताधारी मंडळी न्यायालयात गेली. आमची सत्ता होती. त्यावेळी मागील काम करणाऱ्या मंडळींची देणी दिली. आज कारखाना कर्जबाजारी आहे. याचे भान त्यांनी ठेवावे.
कारखान्याच्या चुकीच्या कारभाराची व कर्जाची आकडेवारी देऊन देखील ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संचालक मंडळाला शाबासकी देण्याची दुर्देवी वेळ आल्याचा टोला माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी अजित पवार यांना यावेळी लगावला.