सुनील जगताप -
उरुळी कांचन : वळती , शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या गावातील नागरिक व व्यावसायिक यांच्यासह कालच्या ढगफुटीचा सगळ्यात जास्त फटका बसला तो बळीराजाला.. त्याच धर्तीवर पावसामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना माहिती देताना साठ वर्षीय शेतकरी विलास रामचंद्र कुंजीर म्हणाले, '' साहेब आता किती बी पाऊस पडू द्या, अजिबात घाबरत नाही.. कारण या पावसाने नुकसान होण्याजोगे काही शिल्लक ठेवलेच नाही तर घाबरु कशाला?..'' या साठ वर्षीय शेतकऱ्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू आणि हा काळजाचा ठाव घेणाऱ्या संवादाने उपस्थित असलेले सारेच जण काहीवेळ गहिवरले.
विलास कुंजीर यांच्या मालकीच्या चौदा एकरामधील ऊस, कांदा, बाजरी, मका, भुईमूग अशी विविध पिके रविवारी झालेल्या पावसामुळे वाहुन गेली आहेत. दोन विहिरी मातीने व दगड धोंड्यामुळे बुजल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोमवारी ( दि. १९) वळती, शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी ढगफुटीने झालेल्या सर्वप्रकारच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभाग, इरिगेशन विभागांच्या समन्वयातून करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सात दिवसाच्या आत पाठवावेत असे आदेश देशमुख यांनी दिले.यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर,तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, प्रशासक निकेतन धापटे आदी उपस्थित होते.