शिरूर बसस्थानकाचा बीओटी प्रकल्प स्थगित
By Admin | Updated: July 3, 2014 05:36 IST2014-07-03T05:36:47+5:302014-07-03T05:36:47+5:30
बसस्थानक बीओटी प्रकल्पाबाबत अण्णा हजारे यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेऊन, या प्रकल्पास स्थगितीचे परिवहन सचिवांना आदेश दिले आहेत.

शिरूर बसस्थानकाचा बीओटी प्रकल्प स्थगित
शिरूर : बसस्थानक बीओटी प्रकल्पाबाबत अण्णा हजारे यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेऊन, या प्रकल्पास स्थगितीचे परिवहन सचिवांना आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे आज क्रांतिवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी उपोषण सोडले. पाचंगे यांची आई व मुलगी यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले.
शिरूर बसस्थानक बीओटी प्रकल्पाच्या विरोधात पाचंगे यांनी बसस्थानकासमोर उपोषण सुरू केले होते. ग्राहक पंचायत, शेतकरी संघटना, किसान संघ व पतंजली योग समितीचा या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. एसटीच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी पाचंगेंशी दोनवेळा चर्चा केली. मात्र, यात समाधान न झाल्याने पाचंगे यांचे उपोषण सुरू राहिले. एसटीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष दिले नाही.
३० जूनला अण्णा हजारे यांना शिरूरचे शिष्टमंडळ जाऊन भेटले. यावर हजारे यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांना, प्लॅन एस्टीमेट, नकाश नसताना हा प्रकल्प राबवण्याची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा उल्लेख करून, याप्रश्नी लक्ष घालण्याबाबत पत्र, ई-मेल केले होते.
मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेतली. नकाशा, आराखडा तयार नाही अशा प्रकल्पाचा अभ्यास करून, तो सादर करा व तोपर्यंत या प्रकल्पाला स्थगिती द्या, अशा आदेशाचा शेरा मुख्यमंत्र्यांनी हजारेंच्या पत्रावर मारला व याबाबत हजारे यांनाही कळविण्यात आले.
हजारे यांना माहिती प्राप्त झाल्यावर माजी नगरसेवक रवींद्र धनक, अनिल बांडे व हजारेंचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेऱ्याचे पत्र उपोषणस्थळी आणल्यानंतर, पाचंगेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. उपोषण सोडण्यासाठी मान्यवरांनी आपली मते मांडली.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपा नेत्या जयश्री पलांडे, मराठा महासंघाचे नामदेवराव घावटे, बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत दसगुडे, मनसेचे जिल्हा संघटक संदीप भोंडवे, माजी नगरसेवक रवींद्र धनक, पं. स. सदस्य भगवान शेळके, बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, नम्रता रावारी आदींची भाषणे झाली.
तहसीलदार रघुनाथ पोटे, पोलीस निरीक्षक निंबाळकर, शिक्रापूरचे सरपंच रामभाऊ सासवडे, आमदाबादचे माजी सरपंच प्रकाश थोरात, भाजपा युवामोर्चाचे मितेश गादिया, मनसेचे सुशांत कुटे, पारुबाई पठारे, सुहास मलगुंडे आदी
उपस्थित होते.
पाचंगे यांनी हजारे यांच्यासह आपले सर्व सहकारी, नागरिक, संस्था, संघटना, यांचे आभार मानले. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना बीओटी प्रकल्प कायमचा गुंडाळण्यासाठी आता लढा देणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)