शिवसेनेच्या आशा उंचावल्या; राष्ट्रवादीला बंडखोरीचे ग्रहण
By Admin | Updated: May 19, 2014 02:21 IST2014-05-19T02:21:51+5:302014-05-19T02:21:51+5:30
शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने सर्वाधिक मताधिक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकाविला.

शिवसेनेच्या आशा उंचावल्या; राष्ट्रवादीला बंडखोरीचे ग्रहण
पिंपरी : शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने सर्वाधिक मताधिक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकाविला. या मोठ्या यशाने इच्छुकांच्या आशा उंचावल्या आहेत. गेल्या वेळेस अगदी थोडक्यात हुकलेले यश यंदा कोणत्याही परिस्थितीत खेचून आणण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांनी भोसरीत पूर्वीपासूनच लक्ष ठेवून बांधणी केल्याने त्यांना येथून भरघोस मतदान झाले. गेल्या वेळेची २७ हजार ५३४ मतांची आघाडी वाढून ती ८४ हजार ४००हून अधिक इतकी वाढली आहे. राष्ट्रवादीच्या नाराजांना आपल्याकडे वळविण्यात त्याची रणनीती यशस्वी ठरली. आढळरावांचा मोठा विजय, मोदी लाट आणि सत्ताधार्यांविरोधात असलेला रोष यामुळे येत्या विधानसभेत शिवसेनेच्या आशा उंचावल्या आहेत. आढळराव यांना मंत्रिपद मिळाल्यास विधानसभेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची होईल. पक्षातील विरोधकांची साफसफाई करण्यात आढळरावांना यश आले. त्यामुळे एकदिलाने सेनेचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. यमुनानगरच्या ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे शहरउपप्रमुख विजय फुगे हे ही इच्छुक आहेत. विजयाची मोठी खात्री असल्याने इतर पक्षांतील नेतेमंडळीही शिवसेनेच्या मार्गावर स्वार होतील, यात शंका नाही. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात महायुतीला मिळालेली भरघोस मते विधानसभेतही कायम राहिली, तर राष्ट्रवादीचा गड हातातून निसटण्याची शक्यता आहे. राष्टÑवादीकडून विद्यमान आमदार लांडे प्रमुख दावेदार आहेत. तसेच, स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे पूर्वीपासून मैदानात उघडपणे उतरले आहेत. त्याचबरोबर शहराध्यक्ष योगेश बहल, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, नगरसेवक दत्ता साने हे प्रबळ दावेदार आहेत. उमेदवारी नाकारल्याने बंडखोरीचा फटका यंदाही राष्टÑवादीला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी इतर पक्षचिन्हावर राष्टÑवादीचे नेते रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. बंडखोरी थोपविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर राहणार आहे. गटातटाच्या राजकारणाचे ग्रहण राष्टÑवादीला कायम आहे. त्यातून बाहेर निघून पक्षनिष्ठेने, एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. असे चित्र निर्माण झाल्यास राष्टÑवादी गड कायम राखण्यात यशस्वी ठरेल. मात्र, हे आव्हान पेलणे कठीण आहे. शिवसेनेतून महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत दाखल झालेले उमेश चांदगुडे मनसेचे प्रबळ दावेदार आहेत. तसेच, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चिखले, नगरसेवक राहुल जाधव इच्छुक आहेत. राष्टÑवादीचे नाराज नेते इंजिनावर स्वार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी लाटेत भारतीय जनता पक्षाने केंद्रात एकहाती सत्ता मिळविल्याने त्यांच्या आशा पार गगनाला भिडल्या आहेत. शिवसेनेच्या वाट्याची भोसरीची जागा भाजपकडे घेऊन तेथून लढण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. त्यादृष्टीने राज्यातील प्रमुख नेत्यांकडे अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार इच्छुक आहेत. महापालिकेतील २१ प्रभागांचा मिळून हा मतदारसंघ आहे. कामगार वर्गापाठोपाठ ग्रामस्थांची संख्या सर्वाधिक आहे. माळी व मराठा जातीच्या नात्यागोत्याची वीण येथे प्रकर्षाने दिसून येते.