सांडपाण्यामुळे भामा नदी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:03+5:302021-05-15T04:09:03+5:30

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे ...

Sewage pollutes Bhama river | सांडपाण्यामुळे भामा नदी प्रदूषित

सांडपाण्यामुळे भामा नदी प्रदूषित

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे सांडपाणी पठारवाडी मार्गे कौटकरवाडी ते काळुस येथील भामानदी पात्रात सोडले जात आहे. प्लॅस्टिक, वैद्यकीय कचऱ्यामुळे पाण्याला साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगून वर आला आहे. हेच फेसाळलेले सांडपाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. शिवाय ज्या नागरिकांनी या पाण्याचा वापर केला त्यांना त्वचा रोगाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.

चाकण शहरातून जाणाऱ्या या ओढ्यामध्ये लगतच्या ग्रामपंचायतींसह औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी सोडण्यात येत आहे. हेच पाणी शहरातून पुढे पठारवाडी भागातून काळूस येथे भामा नदीला जाऊन मिळते. काळूस, पठारवाडी, राक्षेवाडी, कौटकरवाडी, टेमगिरेवाडी, खैरेवाडी या भागातील शेतकरी शेतीसाठी हे पाणी वापरतात. फेसाळयुक्त सांडपाणी शेतातील पिकांना वापरल्यावर शेतात काळ्या व हिरव्या रंगाचे केमिकलचे थर साचतात. यामुळे शेतीमाल ही खराब होत आहे.

वाढत्या नागरिकीकरणामुळे सांडपाण्याचा स्रोत मोठा आहे. तसेच वारंवार ओढ्यातील गाळमिश्रीत कचरा काढल्याने ओढ्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर ठिकठिकाणी साकव पुल बांधले आहे. पठारवाडी जवळील साकव पुलाजवळ या सांडपाण्याला फेस आला आहे. हेच पाणी पुढे भामा नदीत सोडले जाते. याच पाण्याचा शेतकरी शेती पिकविण्यासाठी करत आहे. या पाण्यावर पिकवलेला भाजीपाला चाकण बाजारात विक्रीला आल्यावर ग्राहकही कुठला भाजीपाला असा प्रश्न विचारतात. पर्यायाने भाजीपाला घेणारा खरेदी करत नाही. तसेच शेतातील पिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या माणसाच्या हातापायाला खाज येणे व त्वचेचे आजार उद्भवू लागले आहेत. जनावरांनाही हे पाणी वापरण धोकादायक झालं आहे.

चाकण नगरपरिषदेने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलावे, या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शहरातील इतर वापरासाठी उपयोगात आणावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वी नगरपरिषदेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवून परिसरातील शेतकऱ्यांची शेती विषमुक्त करावी असे मागणी पत्र दिले आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

१४ चाकण

चाकण शहरातून जाणाऱ्या ओढ्यातील पाणी फेसाळले.

Web Title: Sewage pollutes Bhama river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.