शिरूर : आज राज्यात सर्वत्र शाळा सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह सर्वजण विद्यार्थ्यांचे स्वागत करत असताना शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे मात्र शिक्षक मिळत नसल्याने पहिल्याच दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. सकाळी दहा वाजता शाळा भरण्यापूर्वी एकत्र येत संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले व घोषणाबाजी करत शिक्षण विभागाचा निषेध नोंदवला. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.कोळगाव डोळस येथे काही महिन्यांपूर्वी विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याने बाळू गुंजाळ या शिक्षकाचे शिक्षण विभागाने निलंबन केले होते. यामुळे येथे एकमेव शिक्षक चार वर्गांना शिकवत आहेत. ग्रामस्थांनी लेखी निवेदन देत वारंवार शिक्षक देण्याची मागणी करूनही शिक्षण विभागाने येथे नवीन शिक्षक नेमला नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या शाळेत एकच शिक्षक शिकवण्याचे काम करत आहे.
या शाळेत ५० पेक्षा अधिक पटसंख्येला एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी अनेक पालकांनी आपली मुले इतर शाळेत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन तसेच तोंडी मागणी केली आहे. परंतु याकडे शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. आज शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे स्वागत बाजूला ठेवून शाळेला कुलूप ठोकले. यावेळी उपसरपंच सिद्धार्थ डोळस, राष्ट्रवादीचे सरचिटणीस विलास जगताप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप, माजी सरपंच सोमनाथ सूर्यवंशी, सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष बाबू गोरे, नारायण शेडगे, प्रकाश वाळुंज, संभाजी कुल, आबासाहेब नागवडे, यशवंत पडवळ, प्रकाश पडवळ, अर्जुन सूर्यवंशी, प्रमोद धामोरे, शंकर कोळपे, उमेश सूर्यवंशी, बाळासाहेब धुमाळ आदी उपस्थित होते.
गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षक मागणीची वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षणाधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे अखेरीस शाळेला कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे. - कैलास सूर्यवंशी, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर केंद्रप्रमुखांना संबंधित शाळेवर पाठवले आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळेला एक शिक्षक देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी सहकार्य करावे. - बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षणाधिकारी शिरूर