देहूगाव (पुणे) : यंदा जोरदार पाऊस झाल्याने अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सुरू झाला आहे. ‘‘इंद्रायणीतीरी टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती.’’ अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत येत आहे. आषाढी वारीमुळे वारकरी वर्गात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते.
आषाढीवारीसाठी मंगळवारी सांयकाळीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यामुळे इंद्रायणी हरीभजन आणि भक्तीरसाने न्हाहून निघाली होती. पालखी प्रस्थान सोहळा आज असल्याने भल्या सकाळीच वारकऱ्यांनी इंद्रायणी स्रान केले. सकाळपासूनच आज वातावरण ढगाळ होते. तर अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बसरत होत्या. प्रस्थान सोहळ्याच्या परंपरेनुसार पहाटे पाचला श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरात व शीळा मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधिची व सात वाजता वैंकुठगमण मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्थांच्या हस्ते झाली.
कडेकोट बंदोबस्त, मंदिर सजविले मोहक पुष्पांनी
सकाळपासूनच मुख्यमंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर संपूर्ण मंदिर परिसर सुगंधी फुलांनी सजविला होता. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फुलातील दोन मोर, संत तुकाराम महाराजांची फुलातील प्रतिकृती लक्षवेधी होती. मंदिरपरिसरात कडेकाट बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतूक विभागाच्या वतीने नियोजन केले होते. इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये वारकऱ्यांना सोडण्यात येत नव्हते. सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर असून, दर्शन बारी ग्रामपंचायत पर्यंत पोहोचली आहे.
तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडला
उन सावल्यांचा खेळ सुरू झाला. प्रस्थानाची वेळ झाल्याने तसाच मुख्यमंदिरात दिंड्या जागा घेऊ लागल्या. आसमंती भगव्या पताका फडकावीत वैष्णवांची पावले मंदिराच्या दिशेने पडू लागली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच चैतन्य होते.
दुपारी अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. प्रस्थान सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सोहळ्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर अधून मधून वरूणांचाही अभिषेक सुरू आहे. टाळमृदंगाचा कल्लोळ टीपेला पोहोचला आहे.