सासवड : ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व सासवड पालखी तळाची पाहणी केली. यात पालखी मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणांचा समावेश होता. यंदाच्या वारीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर स्नानगृहे व शौचालयांची व्यवस्था केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी जाहीर केले. तसेच, पावसापासून बचावासाठी ठिकठिकाणी एकाच वेळी पाच हजार वारकऱ्यांना उभे राहता येतील असे वॉटरप्रूफ मंडप प्रथमच उपलब्ध करून दिले जातील, ज्यात मेडिकल आणि मसाजची सोय असेल. सासवड येथील पालखीतळ यापूर्वीच चांगला विकसित करण्यात आल्यामुळे येथे काही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक मुक्काम स्थळांवर झालेल्या नुकसानीची दखल घेत, तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश गोरे यांनी प्रशासनाला दिले. या दौऱ्याचा मुख्य उद्देश पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करणे हा होता असे गोरे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार राहुल कुल, विजय शिवतारे, विशेष कार्य अधिकारी एम. एस. घुले, दादासाहेब कांबळे, प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जालिंदर कामठे, अशोक टेकवडे, पालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, अजित जगताप, आनंद जगताप, मोहन चव्हाण यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती द्विवेदी यांनी माहिती दिली की, घाट रस्त्यात पालखी महामार्गाचे काम चालू असल्यामुळे सुरक्षेसाठी सध्याच्या रस्त्याचे बॅरिकेटिंग केले आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचे काम सुरू असून दिवे घाटातील कचरा काढण्यात आला आहे.
दिवे घाटात कामाची सूचना -
दिवे घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासंदर्भात, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, सध्या नवीन काम थांबवून हाती असलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी येथे बॅरिकेड्सची व्यवस्था करण्याबाबतही निर्देश दिले आहेत. पालखी सोहळा पुढे गेल्यावर पुन्हा काम सुरू केले जाईल, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.