धरण क्षेत्रात मुसळधार
By Admin | Updated: July 18, 2014 03:21 IST2014-07-18T03:21:24+5:302014-07-18T03:21:24+5:30
अनेक दिवस पुणेकरांवर रूसलेल्या वरुणराजाने आपली कृपादृष्टी दाखवायला सुरुवात केली

धरण क्षेत्रात मुसळधार
पुणे : अनेक दिवस पुणेकरांवर रूसलेल्या वरुणराजाने आपली कृपादृष्टी दाखवायला सुरुवात केली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पाणीकपातीच्या संकटात शहरवासीयांना सुखद दिलासा मिळाला आहे. पावसाने अशीच कृपादृष्टी ठेवावी, अशी आशा सर्वसामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये गेल्या ३६ तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ ते गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल ४०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने तळ गाठलेल्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली असून, हा साठा २़४७ टीएमसीवर पोहोचला आहे. तर गेल्या २४
तासांत या पाणीसाठ्यात जवळपास
१ टीएमसी पाण्याची वाढ झालेली आहे.
गेला महिनाभर दडी मारलेल्या पावसाने मागील आठवडाभरापासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगले पुनरागमन केले आहे. गेल्या ३६ तासांत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १९६ टीएमसी, वरसगाव धरणात ९९ मिलिमीटर, पानशेत धरणात १०२ मिलिमीटर, तर खडकवासला धरणात सुमारे २२ मिलिमीटर पावसाची नोंद
झाली आहे. या जोरदार पावसाने
या चारही धरणांची पाणीपातळी चांगली वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच येत्या ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.