पुण्याची पाणीपट्टी तुलनेने कमी
By Admin | Updated: February 6, 2016 01:52 IST2016-02-06T01:52:15+5:302016-02-06T01:52:15+5:30
मुंबई व नागपूर वगळता इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहराची पाणीपट्टी कमी असल्याची आकडेवारी पुणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

पुण्याची पाणीपट्टी तुलनेने कमी
पुणे : मुंबई व नागपूर वगळता इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहराची पाणीपट्टी कमी असल्याची आकडेवारी पुणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, अमरावती या शहरांशी पुणे महापालिकेच्या पाणीपट्टीची तुलना केली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाणीपट्टीमध्ये पुढील ५ वर्षांत ८७ टक्के त्यानंतर पुढील २५ वर्षे सलग ५ टक्के पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या पालिका प्रशासनाच्या प्रस्तावास गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला मनसे, काँग्रेस व शिवसेनेकडून विरोध होेत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इतर शहरांशी पुण्याच्या पाणीपट्टीची तुलना करणारी आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर व मुंबई वगळता इतर शहरांच्या तुलनेत पुण्याची पाणीपट्टी कमी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईमध्ये औद्योगिक व व्यापारी दर जास्त असल्याने तिथे घरगुती पाण्याच्या वापराचा दर कमी ठेवण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.
शहराला २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन गंभीर आहे. ३ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी कर्जाच्या माध्यमातून पैसा उभारला जाणार आहे. त्याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँकेचे पथकाने भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या प्रकल्पाला कर्ज देण्यासाठी प्री-प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला सुरुवातही केली आहे. दरम्यान, कर्ज घेण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याकरिता लगेच राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेबरोबरच जायका आणि जागतिक बँकेकडूनही या प्रकल्पासाठी कर्ज मिळविण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून किती कर्ज मिळू शकेल, हे येत्या आठवडाभरात समजणार आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, त्याबद्दल नागरिकांनी साशंकता बाळगू नये.
- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका