पुणे शहरात वाहतुकीचे नियम सऱ्हास मोडले जातात. सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या चौकांतही, वर्दळीच्या चौकांतच नाही तर अगदी वाहतूक पोलिसांच्या समोरून सिग्नल मोडून हे वाहनचालक वाहन दामटवतात. यात सिग्नल पाळणाऱ्यांची पंचाईत होते, नाहक अपघाताला सामोरे जावे लागते किंवा शिवीगाळही सहन करावी लागते. हे अनुभव बऱ्याचदा येतात. यामुळे या अशा मुजोर वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलीस एआय कॅमेरांद्वारे थेट दंडाच्या पावत्या फाडणार आहेत.
पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AI मार्फत नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर एफसी रोडवर वैशाली हॉटेल समोर एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे, हा या मागचा हेतू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग ओळखणे, त्याची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचे काम याद्वारे केले जाणार आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार याचे उद्घाटन होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार असले तरी यामध्ये त्रास नियम पाळणाऱ्या वाहन चालकांनाही होणार आहे.
वाहतुकीचे नियम पाळणे पाप की काय...
पुण्यात अनेकदा पाठीमागून येणारे हुल्लडबाजी करणारे वाहनचालक इतरांना वाहतुकीचे नियम पाळण्यापासून परावृत्त करतात. असे अनेक प्रकार खासकरून सिग्नलवर घडत असतात. एखाद्याने सिग्नल पाळला तर त्याला शिवीगाळ केली जाते, अश्लील हातवारे केले जातात. दमबाजी केली जाते. मोठमोठ्याने हॉर्न वाजवून त्याला त्रासही दिला जातो. यामुळे तो नियम पाळणारा वाहनचालक जिवाच्या भीतीने बाजुला होतो किंवा सिग्नलवर पहिल्याच रांगेत असेल तर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेतो आणि त्या वाहनचालकाला वाट मोकळी करून देतो. असे झाले तर एआय कॅमेरा मागचा पुढचा विचार न करता या गुंडगिरीला बळी पडलेल्या वाहनचालकालाही दंड करणार आहे. हे प्रकार सर्रास सिग्नलवर घडत आहेत. यामुळे पुण्यात वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे पाप की काय असे वाहनचालकांना वाटू लागले आहे. यामुळे आता एआय कॅमेरा आला की मागच्याचा पुढच्याचा विचार न करता नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना काहीही करून नियम पाळावाच लागणार आहे.