पुणे: राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी (एचएसआरपी) लावण्यात येत आहे; परंतु त्याला वाहनधारकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उच्च सुरक्षा नंबर पाटी न लावलेल्या जुन्या वाहनांची नूतनीकरणाशिवाय कोणतीही कामे करू नये, असा आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत, तसेच उच्च सुरक्षा नंबर पाटीला नोंदणी केलेल्या वाहनधारकांची कोणतीही अडवणूक करू नका, अशा सूचनाही आरटीओंना दिल्या आहेत.
राज्य सरकारकडून १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे. पुणे वगळता राज्यात सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यास नागरिकांना प्रतिसाद खूपच कमी दिसत आहे. या कामाला गती येण्यासाठी परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना सुरक्षा नंबर पाटी न बसवणाऱ्या वाहनांबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जुन्या वाहनांना सुरक्षा नंबर पाटी न बसवल्यास आरटीओत वाहनांसंदर्भात काही कामे करताना नागरिकांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने उच्च सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
अशा आहेत आरटीओंना सूचना
- उच्च सुरक्षा नंबर पाटी न लावलेल्या वाहनांना वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढवणे व उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे ही कामे उच्च सुरक्षा नंबर पाटी लावल्याशिवाय करू नका.- परंतु ज्या नागरिकांनी सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी केली आहे. त्यांची अडवणूक करू नये. त्यांची खातरजमा करून, कामे वेळेत करून द्यावीत.
कोणतीही कामे होणार नाहीत
जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण, परवानाविषयक कामकाज, खासगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण ही कामे सुरू राहणार आहेत. त्याबाबत आरटीओंना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वाहनांची खरेदी-विक्री, आरसी बुक व इतर कामात अडचणी येणार आहेत.
अशी आहे आकडेवारी
- पुण्यातील एकूण वाहने - २६ लाख ३३ हजार- सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी - ४ लाख ९४ हजार- सुरक्षा नंबर पाटी लावलेल्या वाहन संख्या- २ लाख ५० हजार- अर्ज न केलेली वाहन संख्या - २१ लाख ३९ हजार