- भरत निगडे
नीरा : नीरा नदीवरील सुमारे शतकभर जुना आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याशी निगडित असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नीरा-पाडेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सुरक्षेच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा नामशेष करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. “धोकादायक” असा शिक्का मारताना स्थानिकांना विश्वासात का घेतले नाही, तसेच स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सार्वजनिक का केला जात नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हा पूल केवळ दगड-विटांचा बांधकामाचा भाग नसून पालखी परंपरेचा साक्षीदार मानला जातो. आळंदीहून पंढरपूरकडे जाताना पालखी नीरा नदी पार करताना याच पुलावरून दत्त घाटावर येते आणि माउलींच्या पादुकांचे नीरा स्नान पार पडते. त्यामुळे या पुलाला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असे त्रिसूत्री महत्त्व प्राप्त झाले आहे.
इतिहासातील नोंदींनुसार, १९२७ साली ब्रिटिश काळात अभियंता कृष्णा मांडके यांनी वैयक्तिक खर्चातून या दगडी पुलाचे बांधकाम केले. जवळपास ९९ वर्षे उलटूनही हा पूल पूर, पावसाळे आणि वाढत्या वाहतुकीला तोंड देत उभा आहे. विशेष म्हणजे याच नदीवर सुमारे १४० वर्षे जुना दगडी रेल्वे पूल आजही वापरात आहे. रेल्वे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन डागडुजी करण्यात आली असून, त्यावरून वंदे भारत एक्स्प्रेसही धावते. मग एक पूल सुरक्षित आणि दुसरा अचानक धोकादायक कसा, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सध्या रस्ता वाहतुकीसाठी नवीन पर्यायी पूल उभारण्यात आला असून, सर्व वाहतूक त्यावरून सुरू आहे. मात्र, जुना पूल पालखी सोहळ्यादरम्यान नगारखाना, वैभवी लवाजम्यासह माऊलींचा रथ यासाठी वापरला जातो. दररोज पहाटे व्यायामासाठी जाणारे पादचारी, दुचाकीस्वार आणि दत्त मंदिराकडे जाणारे भाविक यांच्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. त्यामुळे हा पूल स्थानिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, पुलावर गंभीर तडे किंवा मोठ्या प्रमाणात दगड निखळल्याचे दृश्य स्वरूपात आढळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डागडुजी केली जाते. तरीही अचानक पूल पाडण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
अन्यायकारक निर्णय
नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे म्हणाले, “१४० वर्षे जुना रेल्वे पूल दुरुस्त करून वापरात ठेवता येतो, तर हा पूल का नाही? पादचारी आणि दुचाकींसाठी तरी सुरू ठेवता आला असता. स्थानिकांना विश्वासात न घेता घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे.”
स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्नचिन्ह कोणी केले
पाडेगावचे माजी सरपंच रघुनाथ धायगुडे यांनीही, “पूर आणि पावसाळ्याला तोंड देणारा पूल अचानक धोकादायक कसा ठरतो? स्ट्रक्चरल ऑडिट कोणी केले आणि त्याचा अहवाल सार्वजनिक का केला जात नाही?” असा सवाल करत खरंच स्ट्रक्चरल ऑडिट झाले का असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
पूल पाडण्याची घाई का ?
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक असल्याचे नमूद झाल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पालखी सोहळ्यादरम्यान हजारो वारकरी पुलावरून जात असल्याने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पालखी सोहळा विश्वस्त योगी निरंजननाथ यांनीही भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र, सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ऐतिहासिक वारसा संपवण्याचा मार्ग निवडला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशभरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू जतन करून वापरात ठेवण्यात येतात; मग नीरा येथील पूल मात्र पाडण्याची घाई का, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.
ऐतिहासिक ओळख जपायची की बुलडोझरखाली गाडायची?
नीरा नदीवरील हा पूल केवळ दगडी रचना नसून पालखी परंपरेचा साक्षीदार आणि स्थानिकांच्या भावनांचा केंद्रबिंदू आहे. सुरक्षेच्या नावाखाली इतिहास पुसण्याचा निर्णय कायम राहतो की संवर्धनाचा मार्ग स्वीकारला जातो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Neera villagers protest the demolition order for a century-old bridge linked to the Palkhi tradition. They question the safety assessment, demanding transparency. The bridge is vital for the annual pilgrimage and local access, sparking concerns about erasing historical heritage for convenience.
Web Summary : नीरा के ग्रामीणों ने पालखी परंपरा से जुड़े शताब्दी पुराने पुल को गिराने के आदेश का विरोध किया। वे सुरक्षा आकलन पर सवाल उठाते हैं और पारदर्शिता की मांग करते हैं। पुल वार्षिक तीर्थयात्रा और स्थानीय पहुंच के लिए महत्वपूर्ण है, जिससे ऐतिहासिक विरासत को मिटाने की चिंता बढ़ रही है।