पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होताच पुणे जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १६१ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे. भाजप ९९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर यापूर्वी कधीही प्रमुख शर्यतीत नसलेल्या शिवसेना (शिंदे गट) ने जोरदार मुसंडी मारत ५१ जागा जिंकून तिसरे स्थान मिळवले आहे.
या निकालामागे महायुतीतील अंतर्गत संघर्ष महत्त्वाचा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने अनेक ठिकाणी ‘आम्हीच मोठे’ अशी भूमिका घेत थेट राष्ट्रवादीशी संघर्ष उभा केला. परिणामी मित्र पक्षांनी आपली सर्व शक्ती पणाला लावत भाजपलाच धक्का देत त्याच्या जागा कमी करण्यात यश मिळवले.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, अलीकडील काळात भाजपने राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची ताकद कमी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. माजी आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे यांना पक्षप्रवेश देत भाजपने राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला. अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनाही भाजपच्या गोटात आणण्याची मोहीम सुरू होती. अशाच पार्श्वभूमीवर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या.
सुरुवातीला महायुती म्हणून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, काही प्रकरणांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचा आरोप होत असताना, शिंदे गटाकडे जिल्ह्यात केवळ दोन आमदार असल्याने त्यांची ताकद मर्यादित असल्याचे चित्र होते. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला. दोन माजी आमदारांनीही ‘आम्हीच दिशा ठरवणार’ अशी ठाम भूमिका घेतली. परिणामी वरिष्ठ पातळीवरही स्वतंत्र लढण्याची भूमिका स्वीकारली गेली. भाजपने मित्रपक्षांना मागे टाकण्याचे मनसुबे आखले; मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसून आले.
नगराध्यक्ष मिळाले; पण बहुमत नाही
जिल्ह्यातील आठ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदे मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, चार नगरपरिषदांमध्ये अशी परिस्थिती आहे की, नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असला तरी बहुमत अन्य पक्षांकडे आहे. विशेषतः शिरूर, भोर, माळेगाव आणि दौंडमध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असला, तरी माळेगाव वगळता उर्वरित ठिकाणी भाजपचे संख्याबळ अधिक आहे. माळेगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीशी युती केली होती; तरीही अपक्षांनी पाच जागा जिंकत जोरदार धक्का दिला.
महेश लांडगे यांची जादू फिकी
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर भाजपने शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, या मतदारसंघातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. आळंदी वगळता जुन्नर, राजगुरूनगर, चाकण आदी ठिकाणी भाजपला अल्प संख्येवर समाधान मानावे लागले. शिरूरमध्ये माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांनी भाजपसाठी मोठी धावपळ केली. उत्तर पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि जयश्री पलांडे यांचीही त्यांना साथ मिळाली. तरीही निकाल पाहता आमदार महेश लांडगे यांची राजकीय जादू काहीशी कमी झाल्याचे दिसून आले.
झेडपीसाठी पुढील लढाई
नगरपालिका निवडणुकांतील यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उत्साह संचारला आहे. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपही जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
इंदापूरला सारिका भरणेंचा करिष्मा
इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठेची मानली जात होती. भरत शहा राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर एकत्र येत मुकाबला उभा राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांमुळे प्रदीप गारटकर वरचढ ठरतील, असे चित्र होते. मात्र, ऐनवेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी प्रचाराची सर्व सूत्रे हाती घेतली. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न निर्णायक ठरला. त्यातूनच भरत शहा विजयी झाले आणि इंदापूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित झाली.
Web Summary : NCP secured the most seats in Pune's local elections, followed by BJP. Shinde faction surprisingly gained significant ground. Internal conflicts within the Mahayuti alliance impacted results. NCP retains dominance despite BJP's efforts to weaken it.
Web Summary : पुणे के स्थानीय चुनावों में राकांपा ने सबसे ज्यादा सीटें हासिल कीं, उसके बाद भाजपा रही। शिंदे गुट को आश्चर्यजनक रूप से महत्वपूर्ण लाभ हुआ। महायुति गठबंधन के भीतर आंतरिक संघर्षों ने परिणामों को प्रभावित किया। भाजपा के कमजोर करने के प्रयासों के बावजूद राकांपा का दबदबा बरकरार है।