पुणे : कात्रज परिसरातील सुखसागरनगर येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींंना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि.८) पकडले आहे. मुसम्मद सोनी अब्दुल समद खातून (२२), मोनीरा बेगम (१९, दोघी मूळ रा.गुजिया, जि.बोगारा, बांगलादेश) अशी पोलिसांनी पकडलेल्या तरुणींची नावे आहेत.
पोलिस कर्मचारी अमोल घावटे, प्रफुल्ल मोरे यांना माहिती मिळाली होती की, सुखसागर परिसरात काही बांगला देशी तरुणी बेकायदा वास्तव्य करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. दोघी घुसखोरी करून भारतात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बांगलादेशी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात येणार आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलिस कर्मचारी राजेंद्र नलावडे, कानिफनाथ कारखेले, अमोल घावटे, गणेश थोरात, प्रफुल्ल मोरे, भरत गुंडवाड, गणेश माने, सर्जेराव सरगर, शिवाजी सातपुते, शीतल जमदाडे, नेहा तापकीर यांनी ही कारवाई केली.