राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधीपक्षांनी आवाज उठवला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उबाठाने येत्या ५ जुलैला मोर्चा काढण्याचे जाहीर केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनीही हिंदी सक्तीला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की, "मी माझी भूमिका मांडली आहे. आज आमची कॅबिनेट असते, तिथे त्यावर आम्ही चर्चा करू. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना भाषा शिकता यावी, असे वाटत असते. मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे. आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावे आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी. जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येते.मराठी शिकले की हिंदी पण येते, लिपी तीच आहे. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो."
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले की, "कोणी कोणाला विरोध करायचा? यात आमचा काय संबंध आहे. कोणी एकत्र यावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, यात आपण लोकांनी नाक खुपसायचे काय कारण आहे? आपण ही त्यांना म्हटले नव्हते की वेगवेगळे व्हा, त्यांनी काय करावे, त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, घटनेने सगळ्यांना अधिकार दिला आहे. मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. जेव्हा काही पक्ष एकत्र येऊन काम करतात तेव्हा मतप्रवाह असतो पण नंतर जेव्हा राज्याच्या हिताचे काय आहे? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय आहे? या गोष्टी पहायच्या असतात."